नवी दिल्ली – टू-मॅन आर्मी असणाऱ्या केंद्र सरकारला संसदेविषयी अतिशय कमी आदर आहे. मर्जी चालल्यास दोन जंटलमेन संसदही बंद करतील, अशा शब्दांत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला.
संसदेचे नुकतेच आटोपते घेण्यात आलेले पावसाळी अधिवेशन मोठ्या गदारोळातच समाप्त झाले. राज्यसभेत तर अखेरच्या दिवशी प्रचंड गोंधळ झाला. त्यापार्श्वभूमीवर, पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत चिदंबरम यांनी सडेतोड भूमिका मांडली.
दिलेला शब्द न पाळता सरकारने गुपचूपपणे विधेयके मंजूर करण्याचा प्रयत्न केल्याने राज्यसभेत गोंधळ झाला. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे पीठासीन अधिकारी हवे तितके तटस्थ नाहीत. संसदेतील चर्चेवेळी मोदी आणि शहा उपस्थित का राहिले नाहीत, असा सवाल त्यांनी केला. पेगॅसस पाळत प्रकरणी सरकारने चर्चेची तयारी दर्शवली नाही. त्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशीचा आदेश दिला जाण्याची आशा वाटते, असे ते म्हणाले.
विरोधकांच्या ऐक्याच्या सध्या चर्चा सुरू आहेत. त्याविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना चिदंबरम यांनी आशावादी भूमिका मांडली. विरोधकांचे ऐक्य घडवण्यात निश्चित काही अडचणी येतील. मात्र, संयम आणि बैठकांच्या माध्यमातून ते घडू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.