नवी दिल्ली – काँग्रेसचे दिग्गज नेते पी चिदंबरम यांच्यासह गांधी घराण्याविरोधात बंड करणारे कपिल सिब्बल निवडणुकीशिवाय राज्यसभेत पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले 41 उमेदवार बिनविरोध निवडून आले. ते उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पंजाब आणि तामिळनाडूमधून राज्यसभेत पोहोचले आहेत. यामध्ये भाजप, काँग्रेस, आप, आरएलडी, एसपी, जेएमएम, डीएमके, एआयएडीएमके आणि वायएसआर काँग्रेस या पक्षांव्यतिरिक्त एका अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे. यातील बहुतांश नेते उत्तर प्रदेशातील आहेत.
उत्तर प्रदेशमधून भाजपच्या आठ सदस्यांसह 11 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपकडून डॉ. के. लक्ष्मण, मिथिलेश कुमार, बाबुराम निषाद, संगीता यादव, लक्ष्मीकांत बाजपेयी, डॉ.राधामोहन दास अग्रवाल, सुरेंद्र नागर आणि दर्शन सिंग आहेत. कपिल सिब्बल आणि आरएलडी अध्यक्ष जयंत चौधरी सपाच्या पाठिंब्याने विजयी झाले. सपाचे जावेद अली हेही बिनविरोध विजयी झाले आहेत.
बिहारमधील राज्यसभेच्या पाच जागांसाठी शुक्रवारी जेडीयू, भाजप आणि आरजेडीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. JD(U) उमेदवार खिरू महतो, भाजपा उमेदवार सतीश चंद्र दुबे आणि शंभू शरण पटेल तर RJD उमेदवार मीसा भारती आणि डॉ. फयाज अहमद यांना विजयी घोषित करण्यात आले.
पर्यावरणवादी बलबीर सिंग सीचेवाल आणि विक्रमजीत सिंग साहनी हे पंजाबमधून आपच्या तिकीटावर बिनविरोध निवडून आले आहेत. मध्य प्रदेशमधून काँग्रेसचे विवेक तनखा, भाजपच्या कविता पाटीदार आणि सुमित्रा वाल्मिकी यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. तर झारखंड मुक्ती मोर्चाचे महुआ माझी आणि भाजपचे आदित्य साहू हे झारखंडमधून बिनविरोध निवडून आले आहेत. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात माझी आणि साहू यांची ही पहिलीच वेळ असेल.
छत्तीसगडमध्ये शुक्रवारी काँग्रेसचे उमेदवार राजीव शुक्ला आणि रणजीत रंजन यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली. राजीव शुक्ला याआधी तीन वेळा राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. रणजीत रंजन या बिहारच्या माजी लोकसभा खासदार आहेत. त्यांच्या निवडीनंतर राज्यात तीन महिला राज्यसभा सदस्य झाल्या आहेत.
तामिळनाडूतून अर्ज दाखल केलेले सर्व सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये डीएमकेचे केएस कल्याणसुंदरम, आर गिरीराजन आणि केआरएन राजेश कुमार, एआयएडीएमकेचे सीव्ही षणमुगम आणि आर धर्मर आणि काँग्रेसचे पी. चिदंबरम यांचा समावेश आहे. उत्तराखंडमधील भाजप नेत्या डॉ. कल्पना सैनी यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. तर आंध्र प्रदेशमधून वायएसआरसीचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये व्ही.विजयसाई रेड्डी, बी. मस्तान राव, आर. कृष्णय्या आणि एस. निरंजन रेड्डी यांचा समावेश आहे. आता राज्यसभेतील वायएसआर काँग्रेसच्या सदस्यांची संख्या नऊ झाली आहे.