नवी दिल्ली – दिल्लीच्या सीमांवर गेल्या आठ महिन्यांपासून अधिक काळ धरणे धरून बसलेले शेतकरी येत्या 15 ऑगस्ट रोजी किसान मजदूर आझादी संग्राम दिवस साजरा करणार आहेत.
त्यादिवशी संयुक्त किसान मोर्चाने देशभरातील शेतकऱ्यांना ब्लॉक व तालूका पातळीवर तिरंगा रॅली काढण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीत सीमावर्ती भागातही ही रॅली काढली जाणार आहे, पण आम्हीं ही रॅली घेऊन दिल्ली शहरात शिरणार नाही असेही शेतकऱ्यांनी नमूद केले आहे.
ट्रॅक्टर, मोटारसायकल, सायकल आणि बैलगाड्या घेऊन ही रॅली काढण्याची सूचना शेतकऱ्यांना करण्यात आली आहे. 15 ऑगस्ट रोजी देशभरात सर्वत्र ही तिरंगा रॅली काढली जाणार आहे.
सिंघु, टिकरी आणि गाझीपुर बॉर्डरवरचे शेतकरीही हा संग्राम दिवस साजरा करणार असून त्यानिमीत्त त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.