मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात आला. दरम्यान, या सोहळ्याला गालबोट लागले आहे. या कार्यक्रमासाठी आलेल्या ११ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला तर, अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे . त्यातच उद्धव ठाकरे यांनी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख करत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.
कार्यक्रमासाठी आलेल्या अनुयायांना उष्माघाताचा त्रास झाल्याची माहिती समोर येताच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार अरविंद सावंत, आमदार आदित्य ठाकरे यांनी रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्यांची भेट घेत विचारपूस केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी याची चौकशी कोण करणार? असा सवाल उपस्थित केला आहे.
#WATCH| Navi Mumbai: Uddhav Thackeray, Aditya Thackeray & NCP leader Ajit Pawar interact with Doctor in MGM Kamothe Hospital, take stock of the situation
11 people died & more than 20 are undergoing treatment after they suffered heatstroke during Maharashtra Bhushan Award… pic.twitter.com/0nNGvGlFXW
— ANI (@ANI) April 16, 2023
माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी, “डॉक्टरांनी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. कार्यक्रमाच्या चुकीची वेळ कोणी दिली? ढिसाळ कारभारामुळे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाला गालबोट लागलं. सरकार या घटनेची चौकशी करेल की नाही माहिती नाही. पण, अमित शाहांना दौऱ्यासाठी जायचं असल्याने हा कार्यक्रम भर दुपारी घेतला असेल, तर याची चौकशी कोण करणार? या घटनेत निरपराध जीव गेले आहेत. अमित शाहांना वेळ नसल्याने जर हा कार्यक्रम दुपारी ठेवला असेल, तर विचित्र प्रकार आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.