शिर्डी – सध्या साई संस्थांनाचा कारभार खऱ्या अर्थाने साई भरोसेच सुरू असल्याचे चिऋ दिसत आहेत. साईंच्या शिर्डीत भाविकांची वाढती गर्दी आणि भाविकांनी बाबांच्या झोळीत टाकलेले दान हे दिवसेंदिवस वाढतच आहे. या दानाचा विनियोग चांगल्या कामासाठी व्हावा, हीच दानशूर भाविकांची इच्छा असते, परंतु भाविकांच्या इच्छेला कुठे तरी तडा जात आहे, असच काहीसं चित्र शिर्डीत बघावयास मिळत आहे. त्यामुळे अनेक महत्वपूर्ण प्रकल्प रेंगाळल्याने त्याचा मनस्ताप भाविकांना सहन करावा लागत आहे.
112 कोटी रुपये खर्च करून भाविकांसाठी अद्ययावत दर्शनरांगेचे काम पूर्ण झाले तरी केवळ दर्शनरांगेची इमारती उद्घाटनच्या प्रतीक्षेत आहे. परिणामी ऐन उन्हाळ्यात भाविकांना चटके सहन करण्याची नामुष्की येत आहे. दुसरीकडे गोरगरिबांच्या मुला- मुलींना आधार ठरलेले शैक्षणिक संकुलाच्या कामाची मुदत संपूनही ते काम पूर्ण झालेले नाही. त्याचे काम कासवागतीने सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न उभा राहिला आहे. साईबाबा व साईनाथ हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मोफत दिल्या जाणाऱ्या औषधांची निविदा अद्यापही काढण्यात आलेली नाही. त्याची प्रतीक्षा आहे.
तर या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता ही मोठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे सोनोग्राफी मशीन धूळखात पडले आहे. हॉस्पिटलची संगणक प्रणाली ही 2005 पासून अद्ययावत झाली नसल्याने अनेकवेळा रुग्णांच्या नातेवाईकांना ताटकळत उभे रहावे लागत आहे.
वास्तविक हॉस्पिटल हा संवेदनशील विषय असूनही साई संस्थान प्रशासन याबाबत गंभीर नाही हे दुर्दैव असून यामुळे अनेक रुग्णांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. 24 तास सुरक्षा रक्षक असूनही रुग्णांच्या नातेवाईकांच्या, संस्थान कर्मचाऱ्यांच्या दुचाकी वाहनांची चोरी सर्रास होत आहे.
केवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव असल्याने चोरांची चंगळ होत आहे. यासर्व गंभीर बाबींवर अभ्यास करून निर्णय घेण्याची जबाबदारी ही साई संस्थांनच्या त्रिस्तरीय कमिटीची असून त्यांना वेळच भेटत नसल्याने सर्वात श्रीमंत असलेल्या साई संस्थांनच्या कारभाराचा गाडा कासवा गतीने पुढे जात असल्याच चित्र सर्वजण अनुभवत आहे. यामुळे शिर्डी परिसरातील नागरिक आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी असून राज्य सरकारने लक्ष घालण्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
“साई संस्थांनच्या हलगर्जीपणामुळे अनेक महत्त्वाच्या प्रकल्पाची निर्मिती फक्त कागदावरच पडून आहे तर शिर्डीच्या विकासाबाबत व भाविकांच्या सुविधेसाठी गळचेपी भूमिका ही भविष्यात खूप त्रासदायक ठरू शकते,” असे शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते म्हणाले.