सातारा – राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली त्यावेळी आमदारांची संख्या जास्त असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता. पण, तसे झाले नाही. त्यावेळी अजितदादा मुख्यमंत्री झाले असते तर कदाचित राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वाढलेला पाहायला मिळाला असता, असे विधान राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, “”ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री असे महाविकास आघाडीत देखील ठरलं असावं. त्यांच्या सुत्राप्रमाणे विचार केला तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मुख्यमंत्रिपद मिळायला पाहिजे होते. ते का मिळू शकले नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.
त्यावेळचे मुख्यमंत्रिपदाचे मुख्य दावेदार अजितदादाच होते. पक्ष संघटना वाढवण्यासाठी ते नेहमीच प्रयत्न करत असतात. त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला असता तर कदाचित राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वाढलेला पाहायला मिळाला असता. मात्र, आमदारांची संख्या जास्त असूनही अजितदादांची मुख्यमंत्री पदाची संधी हुकली.” 2014 मध्ये मुख्यमंत्रिपद जायला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेतेच जबाबदार आहेत, असे विधान अजित पवार यांनी केले होते. त्यांच्या या विधानाला शंभूराज देसाई यांनी दुजोरा देत अजितदादांच म्हणणं योग्य आहे, असे म्हटले आहे.