संगमनेर – नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक काळात दिल्लीतील नेतृत्त्व आमच्याशी चर्चा करत होते, तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आमच्या विरोधात बोलत होते. मला कॉंग्रेसमधून बाहेर काढण्याचे षड्यंत्र रचण्यात आले; परंतु मी भविष्यात अपक्ष राहणार असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे मार्गदर्शन घेऊन काम करत राहणार आहे. मी कॉंग्रेस सोडलेली नाही, असे आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
तांबे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी, कटकारस्थान रचण्यात आले. माझ्या कुटुंबावर आरोप करणे, हे स्क्रिप्टेड षड्यंत्र होते. ही स्क्रिप्टेड स्टोरी माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी रचण्यात आल्याचा आरोपही तांबे यांनी केला. आमदार सत्यजीत तांबे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत कॉंग्रेसमधील प्रदेश कार्यालयातील नेत्यांनी गोंधळ घालून कशाप्रकारे उमेदवारी मिळवून दिली नाही, याबाबतचा घटनाक्रम सांगितला.
गेल्या अनेक वर्षांपासून कॉंग्रेसमध्ये निष्ठेने काम करतोय, परंतु निवडणुकीदरम्यान तांबे कुटुंबीयांवर अनेक आरोप करण्यात आले. युवक प्रदेशचा अध्यक्ष असताना कॉंग्रेसचे संघटनात्मक काम केले. 2030 मध्ये तांबे कुटुंबाला कॉंग्रेसमध्ये 100 वर्ष पूर्ण होतील. युवक कॉंग्रेसमध्ये काम करताना 50 केसेस असलेला एकमेव मी आहे; मी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली असताना वडील आमदार असल्याने तुम्हाला संधी देता येणार नाही, असे कॉंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी सांगितले.
माझ्या वडिलांनी निवडणूक लढणार नसल्याचे सांगितले होते. तरीही शेवटच्या दिवशी 12.30 वाजता दिल्लीतून माझ्या वडिलांचे नाव जाहीर करण्यात आले. विधानपरिषदेच्या इतर कोणत्याही उमेदवाराचे नाव दिल्लीतून जाहीर झाले नव्हते. मग ही एकच उमेदवारी दिल्लीतून का जाहीर झाली? असा सवाल विचारला. एखाद्या स्क्रिप्टनुसार घडामोडी घडत गेल्या आणि मला कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्यापासून दूर ठेवण्यात आले, असा आरोप तांबे यांनी केला.
हे सर्व बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी आणि तांबे परिवाराला कॉंग्रेसबाहेर ढकलण्यासाठी रचलेले कारस्थान होते. मी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माझ्या कुटुंबियांविरोधात भाजपशी संधान बांधल्याचे खोटे आरोप करण्यात आले.
मला 9 जानेवारीला एबी फॉर्म द्यावा, असं प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं. माझा माणूस नागपूरला दोन दिवस असताना 11 तारखेला फॉर्म मिळाले. हे फॉर्म नाशिक पदवीधरचे नसल्याचे कळले. हे फॉर्म औरंगाबाद आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सही त्यावर होती. प्रदेश कार्यालयाकडून एवढी गंभीर चूक कशी काय होऊ शकते? हे फॉर्म चुकीचे आल्याचेही पक्षाला कळवले होते. जर मला अपक्ष फॉर्म भरायचा असता तर मी प्रदेश कार्यालयाला चुकीचा फॉर्म आल्याचे कळवलं नसतं. मी एच. के. पाटील यांना फोन केले, परंतु, त्यांनी माझा एकही फोन उचलला नाही. तर नाना पटोले यांचा फोन बंद होता. त्यामुळे मी इंडियन नॅशनल कॉंग्रेसच्या नावाने फॉर्म भरला, पण एबी फॉर्म नसल्याने तो अपक्ष म्हणून कन्व्हर्ट झाला, अशा खुलासा तांबे यांनी केला.
नाना पटोले मोठे, मी छोटा कार्यकर्ता
ऐन निवडणुकीआधी मला चुकीचे एबी फॉर्म दिले. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस एवढा गलथान कारभार कसा काय करू शकते. ऐन निवडणुकीआधी अशी गंभीर चूक करणाऱ्या महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसवर दिल्लीतून काय कारवाई केली जाईल? असा सवाल करत नाना पटोले हे मोठे नेते आहेत. मी फार छोटा कार्यकर्ता आहे. त्यांच्याशी माझ काय वैर असू शकते? याचे मला कोडे पडल्याचे सत्यजित तांबे यांनी स्पष्ट केले.