नवी दिल्ली : देशात हिंदू-मुस्लिम याविषयी अनेकांनी वाद निर्माण करणारे वक्तव्य केले आहेत. त्यात आज करणी सेनेचे अध्यक्ष आणि भाजपचे प्रवक्ते सूरज पाल अमु यांनी देखील असेच वक्तव्य केले.इतिहास घडवा म्हणजे इथे तैमूर, औरंगजेब, बाबर, हुमायून जन्माला येणार नाहीत. असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांच्या वक्तव्याच्या विरोधी एक विधान करत त्यांना अप्रत्यक्षपणे विरोध केला असल्याचे दिसत आहे.
भारतात मुस्लीम व्यक्ती राहू शकत नाही, असे एखादा हिंदू म्हणत असेल तर तो हिंदू नाही असं स्पष्ट मत प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. तसंच हिंदू-मुस्लीम ऐक्य’ हे दिशाभूल करणारे आहे, कारण हिंदू-मुस्लीम मूलत: एकच आहेत असंही ते म्हणाले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील मुस्लीम राष्ट्रीय मंचने आयोजित केलेल्या ‘हिंदुस्थान फर्स्ट, हिंदुस्थानी बेस्ट’ या कार्यक्रमात भागवत बोलत होते.
“आपण लोकशाही देशात असल्याने हिंदू किंवा मुस्लीम यांचे वर्चस्व असू शकत नाही असे सांगताना ’सर्व भारतीयांचा ‘डीएनए’ सारखाच आहे. त्यामुळे ‘भारतात इस्लाम धोक्यात’ या भयचक्रात मुस्लीमांनी अडकू नये,” असे आवाहन यावेळी त्यांनी केलं. “झुंडबळीच्या गुन्ह्यात सामील असलेले लोक हिंदू नाहीत, ते हिंदुत्वविरोधी आहेत,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
If a Hindu says that no Muslim should live here, then the person is not Hindu. Cow is a holy animal but the people who are lynching others are going against Hindutva. Law should take its own course against them without any partiality: RSS chief Mohan Bhagwat in Ghaziabad pic.twitter.com/ZcBS5X6mF5
— ANI UP (@ANINewsUP) July 4, 2021
हिंदू-मुस्लीमांमधील संघर्षांवर विसंवाद नव्हे, तर संवाद हाच एकमेव उपाय आहे, असेही ते म्हणाले.”आपण लोकशाही देशात आहोत. त्यामुळे देशात हिंदू किंवा मुस्लीम यांचे वर्चस्व असू शकत नाही, तर देशात केवळ भारतीयांचेच वर्चस्व असले पाहिजे,” असं भागवत यांनी सांगितलं. “ऐक्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही. परंतु एकीचा आधार राष्ट्रवाद आणि पूर्वजांचे संचित असले पाहिजे,” असेही भागवत म्हणाले. “लोकांमध्ये धर्मावरून भेदभाव केला जाऊ शकत नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
झुंडबळीच्या गुन्ह्य़ांत सामील असलेल्या हिंदूंबाबतही भागवत यांनी भूमिका स्पष्ट केली. “झुंडबळी घेण्यात सामील असलेले लोक हिंदुत्वविरोधी आहेत. तथापि, झुंडबळीचे काही खोटे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत,” असंही त्यांनी नमूद केले.
‘‘मी प्रतिमा सुधारण्यासाठी किंवा मतपेढीच्या राजकारणासाठी या कार्यक्रमास आलेलो नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ना राजकारणात आहे ना त्याला प्रतिमा जपण्याची चिंता आहे. संघ देशाला मजबूत करण्यासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी काम करतो,’’ असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.