नवी दिल्ली – आयसीसीने कसोटी अजिंक्यपद स्पर्धा सुरू केली त्याचे स्वागतच करतो. मात्र, त्यासाठी देण्यात येणारे गुण, त्याचे निकष अत्यंत बोगस असल्याची टीका वेस्ट इंडिजचे माजी कसोटीपटू व समालोचक मायकल होल्डिंग यांनी केली आहे.
ही स्पर्धा जेव्हापासून सुरू करण्यात आली तेव्हापासून भारतीय संघाने प्रथम क्रमांक कायम राखला. त्याचवेळी जगात करोनाचा हाहाकार सुरू झाला व सर्व स्पर्धा स्थगित झाल्या. मात्र, एकही सामना न होता देखील भारतीय संघाला मागे टाकून ऑस्ट्रेलियाच्या संघाला अव्वल स्थान देण्यात आले. त्यामुळेच ही गुणपद्धती अत्यंत हस्यास्पद आहे.
ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर भारताने वर्चस्व गाजवताना सर्वाधिक गुण मिळविले. मात्र, त्यात गेल्या वर्षी झालेल्या सामन्यांतील विजयाचा निकष लावताना ऑस्ट्रेलियाला अतिरिक्त गुण दिले गेले हे अनाकलनीय आहे. जर ही स्पर्धा सुरू आहे तर त्यातील सामने आता जेव्हापासून सुरू होतील त्यातील निकालांवर गुणपद्धती राबविली गोली पाहिजे, असे मत होल्डिंग यांनी व्यक्त केले.