सोलापूर: करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असले तरी मंदिर समितीच्यावतीने या काळात गरजूंना मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. तालुक्यातील बार्डी वनक्षेत्रात गाई, हरीण, काळवीट असून त्यांच्यासाठी मंदिराने चारा व पाण्याची सोय केली आहे.
करोनाचा पादुर्भाव मोठया प्रमाणात वाढल्याने दिनांक 17 मार्च, पासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. तेंव्हापासून मंदिर समितीच्यावतीने पंढरपूर शहर व परिसरात अडकून राहिलेल्या मजूर व निराधार नागरिकांसाठी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून दररोज 3 हजार फूड पॅकेट देण्यात येत आहेत.
शहरात अंदाजे 60 जनावरांना लॉकडाउनमुळे कोणीच चारा उपलब्ध करून देऊ शकत नाही. त्यामुळे या मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे मंदिर समितीने साडेपाच हजार ते सहा हजार रुपयांचा चारा गेल्या 10 दिवसापासून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
बार्डी तालुका पंढरपूर येथील वन क्षेत्रामध्ये 300 पेक्षा जास्त गाई व 200 पेक्षा जास्त हरीण, काळवीट व इतर वन्यजीव आहेत. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये या वन्यजीवांना विविध स्वयंसेवी संस्थेकडून चारा पुरवठ्याचे काम केले जात होते. परंतु करोनाचा पादुर्भाव वाढल्याने अनेक गोष्टीवर निर्बंध आल्याने या स्वयंसेवी संस्थांनी इकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या वन्यजीवाचा खास करून गाईचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. ही बाब लक्षात आल्यावर मंदिर समितीच्या सदस्यांनी या ठिकाणी समक्ष भेट दिली व वस्तुस्थितीची पाहणी केली. त्यानंतर सर्व सदस्यांशी चर्चा करून या वन्य प्राण्यांना मंदिर समितीने वाचविण्याचा निर्णय घेतला आहे.
यातील पहिला टप्पा म्हणून 4 मे रोजी 2 हजार 500 पेंडी देशी कडबा या वन क्षेत्राजवळील सुखदेव महाराज मठात ठेवण्यात आला आहे. त्याप्रमाणे दररोज 150 ते 200 पेंडी चारा या वन्य जीवांना देण्यास आजपासून सुरुवात केली आहे. तसेच दर दोन दिवसांनी 25 हजार लीटर पाणी टॅंकरद्वारे पाठवून तेथील पाण्याची टाक्या व पाणवठे भरून घेण्यात येत आहेत. जेणेकरून या तहानलेल्या जीवांना पाणी वेळेत उपलब्ध होईल.सद्यस्थितीत 300 च्या आसपास जनावरे या ठिकाणी असल्याचा अंदाज आहे. परंतु ही संख्या वाढली तर त्यांच्यासाठी अधिकचा चारा व पाणी मंदिर समितीने उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे.