देहूगाव – राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सकाळी देहूतील मुख्य मंदिरात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी दर्शन घेत धन्य झाल्याचे समाधान व्यक्त केले.
देहूतील मुख्य मंदिरासमोर बुधवारी (दि.24) सकाळी सव्वानऊच्या सुमारास राज्यपाल कोश्यारी यांच्या ताफ्याचे आगमन झाले. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य ऍड. कैलास पानसरे, माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार, भाजपचे उमाशंकर सिंग आदींनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी तहसीलदार गीता गायकवाड, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, उपनगराध्यक्षा रसिका काळोखे, बांधकाम सभापती योगेश काळोखे, नगरसेविका पूनम काळोखे, ज्योती टिळेकर, पंचायत समितीचे माजी सदस्य सुहास गोलांडे, बाळासाहेब काळोखे, भाजपाचे देहू शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल,अनिरूद्ध काळोखे, सागर मुसुडगे यावेळी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल कोश्यारी पायी चालत मंदिरात गेले. संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप नितीन महाराज मोरे, हभप संजय महाराज मोरे यांनी मंदिराची वैशिष्ट्ये सांगितली. हभप भानुदास महाराज मोरे, हभप अजित महाराज मोरे, हभप संतोष महाराज मोरे, शिवाजी मोरे, जयेश मोरे आदी उपस्थित होते.
मंडपाच्या बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्र ही संतांची पवित्र भूमी आहे. संत शिरोमणी तुकाराम महाराज हे केवळ ज्ञानियांचेच नाही; तर माझ्यासारख्या अल्पज्ञानी आणि सर्वसामान्य जनतेसाठी प्रेरणास्तोत्र आहे.तुकाराम महाराजांचे जीवन अगाध आहे. संत तुकाराम महाराजांच्या या पवित्र स्थळी मी आज येऊन त्यांचे दर्शन घेऊन धन्य झालो आहे. मला विश्वास आहे.त्यांची अभंगवाणी युगानुयुगे प्रेरणा देणारी आहे. त्यानंतर त्यांनी गाथा मंदिरात भिंतीवरील संगमरवरी फरशीवर कोरलेल्या महाराजांचे अभंग गाथा पाहिल्या. यावेळी मंदिराचे संस्थापक पांडुरंग महाराज घुले उपस्थित होते. त्यानंतर त्यांचा ताफा राजगुरूनगरच्या (खेड) दिशेने रवाना झाला.
गळ्यात टाळ, मुखी हरिनामाचा गजर
मंदिरात टाळांच्या गजरात देहूकर दिंडीचा नाद घुमत होता. या सर्वांचे राज्यपाल कोश्यारी यांनी स्वागत केले. त्यांनीदेखील हरिनाम म्हणत टाळ वाजविले. मुख्य मंदिरात कोश्यारी यांच्या हस्ते आरती झाली. श्री राम-लक्ष्मण मंदिर, शिळा मंदिरात दर्शन घेत, मंदिरातील संत तुकाराम जीवनदर्शन चरित्राचा सोहळा त्यांनी पाहिला. भजनी मंडपात महाराजांचे हस्तलिखितातील ठेवलेल्या अभंग गाथा आणि महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. तेथे त्यांनी आपला अभिप्राय नोंदविला.