नवी दिल्ली : सध्या जगभरात लोकांना ऑनलाईन गेम खेळण्याची एवढी सवय लागली आहे कि त्यामुळे त्याच्या आजूबाजूला काय घडतंय याचे त्यांना भान राहत नाही. दरम्यान, देशात बंदी घातलेल्या अशाच PUBG गेम खेळणाऱ्या भारतीय तरुणाने केलेल्या कृत्याने भारताची सुरक्षा यंत्रणाच कामाला लावली आहे. पाकिस्तानच्या चार मुलाची आई असणाऱ्या महिलेच्या प्रेमात हा भारतीय तरुण पडला आणि सुरु झाली या सर्व गोष्टीची सुरुवात…
पाकिस्तानी महिलेचे नाव सीमा असून यातील तरुणाचे नाव सचिन आहे. ही महिला सचिनच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की, ती अवैधरित्या तिच्या चार मुलांसह भारतात आली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली. मात्र या प्रकरणात आता महिलेच्या पतीची एंट्री झाली आहे. कारण पाकिस्तानी महिलेचा पती गुलाम हैदर याने भारत सरकारकडे विनंती केली आहे. सीमा यांचे पती गुलाम हैदर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती केली असून, त्यांची पत्नी आणि चार मुलांना पाकिस्तानात परत पाठवण्याची मागणी केली आहे. त्या व्यक्तीने व्हिडीओ बनवून भारत सरकारला हे आवाहन केले आहे. ती व्यक्ती सध्या सौदी अरेबियात आहे जिथे तो काम करतो. व्हिडिओमध्ये गुलाम हैदर यांनी नरेंद्र मोदी सरकारला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
गुलाम हैदरने त्याची पत्नी आणि मुलांना त्यांच्या मायदेशी पाकिस्तानात परत पाठवायचे आहे. आपल्या पत्नीला PUBG च्या माध्यमातून भारतात येण्याचे आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गुलाम हैदर यांनी नरेंद्र मोदी सरकारला त्यांच्या पत्नी आणि मुलांना सुरक्षितपणे पाकिस्तानात परतण्यासाठी आवाहन केले, जिथे ते कुटुंब म्हणून पुन्हा एकत्रित येऊ शकतील. तसेच सिमा हैदरच्या पतीने भारतीय माध्यमांचे आभारही मानले आहे ज्यामुळे त्याच्या पत्नी आणि मुलांची माहिती मिळाली.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात PUBG या गेमिंग अॅपने झाली. पाकिस्तानी महिला सीमा हैदर PUBG खेळायची, यादरम्यान भारतातील सचिनसोबत खेळताना ओळख झाली अन् काही दिवसातच हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. सचिन ग्रेटर नोएडा येथे राहतो. ही महिला आधीच विवाहित आहे आणि ती तिच्या पतीसोबत पाकिस्तानमध्ये राहायची पण कोणताही विचार न करता सचिनसाठी ती पाकिस्तानची सीमा ओलांडून वैध व्हिसाशिवाय चार मुलांना सोबत घेऊन भारतात पोहोचली.
सीमा नेपाळमार्गे महिनाभरापूर्वी भारतात पोहोचली होती. यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ते वकिलाकडे गेले असता तिच्याकडे व्हिसा नसल्याचे उघडकीस आलं आणि ती भारतात बेकायदेशीपणे आल्याचे कळताच वकिलाने पोलिसात तक्रार केली. या तक्रारीवरुनच पोलिसांनी सीमा, सचिन आणि त्याच्या वडीलांना अटक केली असून १४ दिवसांच्या कोठडीनंतर तिघांनाही आता जामीन मिळाला आहे.