मुंबई – सध्या टोमॅटोच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. एकेकाळी 20 ते 30 रुपये किलो दराने मिळणारे टोमॅटो 150 ते 200 रूपये किलो दराने मिळत आहे. पेट्रोलपेक्षाही आता टोमॅटोचे भाव वाढले आहे. सामान्य माणसांना आता टोमॅटोची खरेदी करणे अवघड झाले आहे. याप्रकरणी अनेकजण संताप व्यक्त करत आहे. परंतु अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी टोमॅटो भाववाढीचे समर्थन केले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, “दोन दिवस टोमॅटो महाग झालाय तर मिडीयात लईच आग लागलीये.. इथं वर्षभर भाव मिळत नाही म्हणून सडून जातो तेव्हा सगळे गप्पगार.. #लाल चिखल असं म्हणत त्यांनी टोमॅटोच्या वाढत्या दराला विरोध करणाऱ्यांना सुनावलं आहे. सध्या टोमॅटोच्या भाववाढीची मीडियावर देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. यावरूनच प्रवीण तरडे यांनी स्पष्ट शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, अनेकदा शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळत नाही. तेव्हा त्या पिकाला कवडीमोल भावानं विकावं लागतं, अनेकदा गुरांना खायला घालण्याची वेळ येते. तसेच पावसामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यावेळी यावर बोलण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. हलाखीच्या परिस्थितीत शेतकऱ्याला जगावे लागते. मात्र याच्या उलट जर एखाद्या भाजीची अथवा पिकांची किंमत वाढली तर त्यावर बोलण्यासाठी हजारो लोक पुढे येतात. याबाबत प्रवीण तरडे यांनी शेतकऱ्यांच्या भावना बोलून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, प्रतिकूल हवामानामुळे उत्पादन घट झाल्याने देशभरात टोमॅटोची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे मुंबईसह देशातील अनेक शहरांत टोमॅटोचे दर 150 पार गेले आहेत. विशेषत: उत्तर भारतात टोमॅटोच्या दरांनी अचानक उसळी घेतली असून, उत्तराखंडमधील काही शहरांत 200 ते 250 रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री होत आहे. मुंबई आणि परिसरातही टोमॅटोला 120 ते 160 रुपये किलो असा भाव मिळत आहे.