मुंबई – नागपुरात पार पडलेले हिवाळी अधिवेशन गाजलं ते विरोधकांच्या आरोपांमुळे. यावेळी विरोधकांच्या रडारवर शिंदे गटातील मंत्री असल्याचे दिसून आले. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची देखील मागणी यावेळी विरोधकांनी केली. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्तार यांनी आपल्यावर झालेल्या घोटाळ्याच्या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिल. यासोबतच त्यांनी पवार कुटुंबियांवर देखील निशाणा साधला.
“मी गोरगरिबांना मदत केली आहे, मोठ्या मोठ्या लोकांचा लवासा बनला,किती नियमाने बनला हे मला माहिती आहे. अनेक असे लवासे आहेत,त्याच्या भरोश्यावर मी बोललो तर त्याला राजकीय वळण येईल म्ह्णून मी काही बोलू शकत नाही असा टोला देखील सत्तार यांनी यावेळी नाव न घेता लगावला. तसेच अनेक अशा शिक्षण संस्था आणि संस्थाने आहेत ज्यांनी एक रुपयावर दोनशे पाचशे एकर जमीन घेतली.ठीक आहे त्यांना सार्वजनिक चांगले काम करायचे असेल यासाठी नाममात्र किमतीवर घेतली असेल परंतु मी ज्या गरिबांना जमीन दिली त्याचा मला काही पश्याताप नाही” असं स्पष्ट मत सत्तार यांनी यावेळी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केलं.
हिवाळी अधिवेशनामध्ये अब्दुल सत्तार यांच्यावर भूखंड घोटाळ्याचे आरोप झाले आणि सरकारविरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका मांडलाय सुरुवात केली होती. त्यानंतर सत्तार यांचा राजीनामा देखील मागण्यात आला. परंतु आता नाव न घेता सत्तार यांनी लवासावरून पवार कुटुंबियांवर निशाणा साधल्याचे पाह्यला मिळाले.