नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयकर विभागाने काँग्रेसच्या बँक खात्यातून 135 कोटी रुपये काढले होते. यानंतर आता पुन्हा एकदा आयकर विभाग काँग्रेसकडून तब्बल 523.86 कोटी रुपये वसूल करण्याची शक्यता आहे. काँग्रेसने 2014 ते 2021 दरम्यान व्यवहार केले असून पक्षाने या पैशांचा कोणताही हिशोब आयकर विभागाला दिलेला नाही. यामुळे कॉंग्रेसची आर्थिक कोंडी होणार असल्याचे दिसून येत आहे.
पक्षाच्या बँक खात्यातून 135 कोटी रुपये काढण्यावर बंदी घालण्याची मागणी विरोधात काँग्रेस पक्षाने या महिन्यात प्राप्तिकर विभागाला न्यायाधिकरण (ITAT) अपील सादर केले होते. मात्र काँग्रेस पक्षाचे अपील फेटाळण्यात आले. त्यानंतर 22 मार्च रोजी काँग्रेसने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत प्राप्तिकर विभागाच्या कारवाईला आव्हान दिले होते. तसेच प्राप्तिकर विभागाने कारवाई उशिरा केल्याचा दावा केला होता. मात्र उच्च न्यायालयाने काँग्रेसच्या भूमिकेचे समर्थन केले नाही. यानंतर आता काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा फटका बसणार आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यात 523.87 कोटी रुपयांचे व्यवहार आढळून आले आहेत. काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. के. तन्खा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, काँग्रेस पक्षाला 523.87 कोटी रुपयांवर मोठा दंड आणि व्याज जोडले जाण्याची भीती आहे.
कारण यापूर्वी 135 कोटी रुपये प्राप्तिकर विभागाकडून जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे आता होणाऱ्या कारवाईतून आम्हाला आणखी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाला निधीची कमतरता भासू शकते, असे तन्खा यांनी स्पष्ट केले.