नवी दिल्ली – महिलांविषयीच्या वक्तव्यावरून टीकेचे लक्ष्य बनलेल्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी बुधवारी विधिमंडळात आणि विधिमंडळाबाहेर दिलगिरी व्यक्त केली. माझ्या शब्दांनी कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास मी स्वत:चीच निंदा करतो, असे त्यांनी म्हटले.
नितीश यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना महिला शिक्षणाचे महत्व ठसवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी महिला शिक्षण गरजेचे असल्याची भूमिका मांडली. बोलण्याच्या ओघात त्यांनी वापरलेले काही शब्द वाद निर्माण करणारे ठरले.
भाजपने (bjp) त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. नितीश यांच्या निषेधाचे सूर सोशल मीडियावरही उमटले. त्या पार्श्वभूमीवर, नितीश यांनी दिलगिरी व्यक्त केली. विधिमंडळ परिसरात दाखल झाल्यानंतर ते पत्रकारांना सामोरे गेले. मी जे काही बोललो; ते अनेकांना रूचले नसल्याचे मला समजले.
आमच्या सरकारकडून महिला सबलीकरणासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची माहिती देण्याचा माझा हेतू होता. मात्र, कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी माझे शब्द मागे घेतो, असे नितीश यांनी म्हटले. त्यानंतर विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांत जाऊन त्यांनी वादग्रस्त ठरलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.