लोणावळा, (वार्ताहर) – तुम्ही आमदार कोणामुळे झालात, तुमच्या निवडणूक अर्जावर अध्यक्ष म्हणून सही कोणी केली, तुमचा प्रचार कोणी केला, सभा कोणी घेतली, कार्यकर्त्यांना दम देण्यापूर्वी याचा विचार करा. मी शरद पवार आहे, माझा नाद करू नका, अशा शब्दात शरद पवार यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांची कानउघाडणी करीत त्यांना सज्जड दम दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लोणावळा शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात शरद पवार बोलत होते. तत्पूर्वी, माजी मंत्री मदन बाफना यांनी आपल्या भाषणात बोलताना आमदार सुनील शेळके हे कार्यकर्त्यांना दमदाटी करीत असल्याचे सांगत खुद्द मला देखील त्यांनी दम दिल्याचे शरद पवार यांच्यापुढे सांगितले. यावर शरद पवार यांनी आमदार शेळके यांचा समाचार घेतला.
तसेच शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या कृषी धोरणावर टीका केली. ते म्हणाले की, ज्या वेळेस मी मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी पहिली फाईल समोर आली ती गहू आयातीची. मी सही केली नाही, पण मी अस्वस्थ झालो. आपला कृषी प्रधान देश आहे आणि आपण गहू आयात करतो, ही गोष्ट मला सतावत होती.
त्यावर त्यावेळी निर्णय घेतले आणि आज आपला देश गहू, साखर यासारख्या क्षेत्रात जगात अग्रेसर आहे. मात्र, आज मोदी सरकारच्या काळात देशात बळीराजाला आत्महत्या करण्याची परिस्थिती आली आहे. तसेच आज रोज मोदी सरकारच्या ज्या जाहिरात येत आहे, त्या कुठून येतात? त्या देखील जनतेच्या पैशातून येत आहेत.
या वेळी माजी राज्यमंत्री मदन बाफना, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के, माजी महापौर संजोग वाघिरे, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, रमेशचंद्र नय्यर, तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, चंद्रकांत सातकर, कुमार धायगुडे, नंदकुमार वाळूंज, नासीर शेख,
यशवंत उर्फ बाळासाहेब पायगुडे, विनोद होगले, अतुल राऊत, भारती शेवाळे, सुरेश चौधरी, दत्तात्रय गोसावी, फिरोज शेख, सुधीर कदम, श्वेता वर्तक, शिवसेनेचे तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, शादान चौधरी आदी उपस्थित होते.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची लोणावळा शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. तसेच तालुका आणि जिल्ह्यातील काही पदे देखील जाहीर करण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षातून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या नासिर (पप्पूभाई) शेख यांच्याकडे लोणावळा शहराच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय श्वेता वर्तक यांच्याकडे महिला आघाडी तर अजिंक्य कुटे यांच्यावर युवक आघाडीची जबाबदारी देण्यात आली आहे.