Aaditya Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाले. यातील उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणारा गट तर दुसरा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारा गट आहे. या दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. यातच आता आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्ही वरळीतून लढा, मी ठाण्यातून निवडणूक लढवतो असे आव्हान दिले. त्यांच्या या आव्हानानंतर आता आदित्य ठाकरे ठाण्यातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, “मी मुख्यमंत्री शिंदे यांना अनेकदा सांगितले तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि माझ्यासमोर वरळीतून लढा नाहीतर मी तुमच्या समोर ठाण्यातून लढतो. आज निवडणूक होत नाही याला आपण लोकशाही म्हणतो का? आपल्या राज्यात यांनी लोकशाही मारलेली आहे. हे घटनाबाह्य सरकार आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सभागृहात गैरहजर आहेत.”
पुढे ते म्हणाले, “धारावीचा विकास होताना एका व्यक्तीचा विकास नको. निवडणुका घ्यायला हे सरकार घाबरते. निवडणुका होत नाहीत, पुणे, चंद्रपुरात निवडणुका नाही सिनेटची निवडणुक देखील हे घेत नाहीत त्यांच्यात हिंमतच नाही. अधिवेशनात अनेक विषय चर्चेला येत आहेत. घटनाबाह्य मुख्यमंत्री यांना इतर राज्यात हाजीर रहा असे सांगितले म्हणून ते राजस्थानला गेले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महत्वाच्या चर्चेला नव्हते.”
आदित्य ठाकरेंनी यापूर्वीही मुख्यमंत्र्यांना ठाण्यातून निवडणूक लढण्याचे आव्हान दिले होते. यावर एकनाथ शिंदे यांनी लोकशाहीत कोणाला कुठेही निवडणूक लढवण्याची मुभा असल्याचे प्रत्युत्तरही दिले होते. आता पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना आवाहन दिले आहे.