– संदीप घिसे
पिंपरी – गौतम आणि उमा (बदलेली नावे) यांचा 2007 साली विवाह झाला. मात्र लग्नाच्या एक तपानंतरही त्यांच्या वेलीवर फूल उमलेले नाही. यामुळे गौतम मनातून कुढत होता. त्यातच त्याला मनाजोगे काम मिळत नसल्याने तो बेरोजगारही होता. तर दुसरीकडे उमा ही कमावती होती. सर्व घरखर्च ती चालवत होती. आपण अनेक ठिकाणी कमी पडत असल्याची सल गौतम याला होती. यामुळे पती गौतम याने पोलिसांच्या महिला सहाय्यक कक्षाकडे अर्ज केला. या अर्जात त्याने आपली पत्नी उमा हिने आपल्याला घटस्फोट देऊन तिने दुसरे लग्न करून सुखी व्हावे, अशी इच्छा प्रगट केली होती. पोलिसांसमोर ही वेगळीच केस उभी राहिली. यावर मार्ग काढण्यासाठी उपनिरीक्षक मनिषा दशवंत यांनी गौतम, उमा आणि त्यांच्या कुटूंबियांना बोलावून घेतले.समुपदेशक संध्या जाधव यांनी उमा आणि गौतम यांच्या बाजू ऐकून घेतल्या. आपण मनोरुग्ण असून उमापेक्षा आपले खूपच वय जादा आहे.
आपण अचानक घर सोडून कित्येक दिवस बाहेर राहतो. आपल्याशी पत्नीने घटस्फोट घेतल्यास ती सुखी होईल. याशिवाय तिला हवी असलेली नुकसान भरपाई आपण देण्यास तयार असल्याचेही गौतम याने सांगितले. मात्र उमा घटस्फोट देण्यास तयार नव्हती. माझे माझ्या पतीवर खूप प्रेम आहे. मूल होण्यासाठी आम्ही दोघेही उपचार घेत आहोत. मी तुम्हाला सोडून कोठेही जाणार नाही, असे उमाने ठामपणे सांगितले. मात्र पती बोलत नसल्याने आमच्यात काहीच संवाद होत नसल्याचे उमा यांनी सांगितले. सासूही सुनेच्या मागे खंबीर उभी राहिली. गौतमने जर उमाला सोडले तर आपण तिचा मुलीप्रमाणे सांभाळ करू, अशी भूमिका घेतली.
पोलीस हवालदार प्रभावती गायकवाड आणि अनिता जाधव यांनी दोन्हीकडील बाजू उपनिरीक्षक दशवंत यांच्या कानावर घातली. त्यानंतर समुपदेशक संध्या जाधव यांनी पती गौतम यांना काहीतरी व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. घरातील सर्वांनी त्यास साथ देण्याची ग्वाही दिली. यामुळे मनाला उभारी आलेल्या गौतम यानेही त्यास होकार दिला. आलेले नैराश्य झटकून आपण पुन्हा आयुष्यातील नवीन पर्वाला सुरवात करू, असे त्याने पत्नी उमा हिला सांगितले. या घटनेला आता तीन महिने लोटले आहेत. पोलीस अधून-मधून गौतम आणि उमा यांचा संसार कसा सुरू आहे, याची चौकशी करतात. समुपदेशनामुळे गौतम याच्या आयुष्यात आता अमुलाग्र बदल झाला आहे. गौमत आणि उमा यांचा संसार सावरला असून सध्या ते सुखात आहेत.
पत्नीची भूमिका ठाम अन् समंजस असल्यास मुला-बाळावरून पती-पत्नीमध्ये वितुष्ट येऊ शकते. यातून भांडणे होऊन संसार उध्वस्त होण्याच्याही अनेक घटना आहेत. मात्र पत्नीने अथवा पतीने समंजसपणाची भूमिका घेतल्यास त्यांचा संसार पुन्हा सुखाचा होऊ शकतो, हेच या घटनेवरून समोर आले आहे. यातील पत्नीने घेतलेली भूमिका निश्चितच कौतुकास्पद होती आणि सासूने घेतलेली भूमिकाही सकारात्मक होती. म्हणूनच संसार सुखी होण्यासाठी दोघांच्याही भूमिका महत्त्वाच्या आहेत.
आमच्या लग्नाला एक तप उलटून गेले आहे. माझ्याबाबत पत्नीच्या अनेक तक्रारी असतील. यामुळे तिने घटस्फोट घ्यावा व दुसरे लग्न करून सुखी व्हावे, यासाठी पतीने पोलिसांकडे अर्ज केला. पतीनेच पत्नीला दुसरे लग्न करण्यास सांगण्याचा प्रकार पोलिसांपुढेही नविन होता. पतीच्या मान्यतेनंतरही पत्नीने मात्र घटस्फोटास स्पष्टपणे नकार दिला. सुनेच्या निर्णयाला सासरच्या मंडळींनीही खंबिरपणे साथ दिली. दोघांचे म्हणणे ऐकूण घेत पोलिसांनी दोघांनाही सुखी संसाराचे उपदेश दिले. पोलिसांनी पतीचे समुपदेशन केल्यानंतर त्या दोघांचा सुखी संसार सुरू आहे.