आझाद मैदानात आंदोलकांची रवानगी
मुंबई : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात आला. जेएनयूमधील हल्ल्याचे वृत्त समजताच मोठ्या संख्येने विद्यार्थी ‘गेटवे ऑफ इंडिया’च्या परिसरात जमले आणि रात्रभर या ठिकाणी धरणे दिले. ऑक्युपाय गेटवे या मोहिमेतून विद्यार्थ्यांचे लोंढे गेटवेकडे वळू लागले. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना ‘गेट वे ऑफ इंडिया’ या परिसरातून स्थलांतरीत करण्यात आले असून त्यांची रवानगी ‘आझाद मैदाना’त करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
Sangramsingh Nishandar, DCP (Zone 1) on protesters(protesting against #JNUViolence) evicted from Gateway of India: Roads were getting blocked and common Mumbaikar and tourists were facing problems. We had appealed to protesters many times,have now relocated them to Azad Maidan pic.twitter.com/aW0gWlKGZj
— ANI (@ANI) January 7, 2020
आम्ही कोणत्याही आंदोलकाला ताब्यात घेतले नसून त्यांना केवळ आझाद मैदानात हलवण्यात आल्याची प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त (झोन-1) संग्रामसिंह निशाणदार यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी जेएनयूमध्ये जी घटना घडली त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे. सामान्य मुंबईकरांना त्रास होऊ देऊ नका, असे आम्ही या आंदोलनाच्या आयोजकांना सांगितले होते. तसेच त्यांनीही याबाबत आश्वासन दिले होते. या आंदोलनात अनेक जण जोडले गेले. त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया परिसरात येणाऱ्या लोकांना त्रास झाला, असेही त्यांनी सांगितले.
‘गेटवे ऑफ इंडिया’ जवळ असलेले ताज महाल हॉटेल ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. त्या ठिकाणी देशातून तसेच परदेशातूनही अनेक पर्यटक येत असताता, कामासाठी मुंबईकर येत असतात. त्यामुळे आम्ही आंदोलकांना अन्य ठिकाणी आंदोलन करण्याची विनंती केली होती. परंतु आंदोलक त्या ठिकाणीच आंदोलन करत होते. त्यांना आम्ही आझाद मैदानात स्थलांतरीत केले आहे. कोणत्याही आंदोलकाला ताब्यात घेतले नसल्याचे निशाणदार यांनी म्हटले.