वाल्हे, (वार्ताहर) – वाल्हे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रेच्या शेवटच्या दिवशी कुस्त्यांचा जंगी आखाडा चांगलाच रंगला. यावर्षी, पुणे जिल्ह्यासह बाहेरी जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो पहिलवानांनी यावेळी, हजेरी लावली होती. वाल्हे येथील श्री भैरवनाथ चैत्री उत्सवानिमित्त सहा दिवशीय यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
कुस्ती आखाड्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ यात्रा कमिटीचे अध्यक्ष साहेबराव पवार, शंकर पवार, वाल्हे गावचे मुलकी पाटील गिरीश पवार, माजी सरपंच अमोल खवले यांच्या हस्ते करण्यात आले. दुपारी चार ते साडेसहा दरम्यान कुस्त्यांचा आखाडा झाला.
कुस्तीसाठी १० महिला कुस्तीगीर यांच्यासह, पुरंदर तालुक्यातील सासवड, शिवरी, वीर, परिंचे, मांडकी, पिंपरी, भोंगवली, पिसर्वे, गराडे, बारामती फलटण, भोंगवली, शेरेवाडी, खंडाळा, सोमेश्वर, मुरूम, पिसर्वे, रावडी, शिवरी, पांगारे, पिंपरी आदि ठिकाणच्या मल्लांनी आखाड्यात सहभाग घेऊन खेळाचे प्रदर्शन दाखविले.
यावर्षी कुस्ती आखाड्यामध्ये मल्लांनी उपस्थिती दर्शवत वेळ संपत चालल्याने मल्लांनी थेट आखाड्यातच प्रवेश केला. काहीकाळ आखाड्यामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी कमिटीला मल्लांना आवर घातला. कमी वेळेअभावी आखाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात मल्लांनी हजेरी लावल्याने, गोंधळाचे वातावरण झाल्याने अखेर यात्रा कमिटीवर आखाडा समाप्त करण्याची वेळ आल्याची नामुष्की ओढवली.
वेळेअभावि सामने कमी…
दरम्यान आखाडा वेळेअभावी लवकर बंद झाल्याने, परगावाहून आलेल्या बहुतांश नामवंत मल्लांनी नाराजी व्यक्त करत रिकाम्या हाताने परत जावे लागल्याने संताप व्यक्त केला. दरम्यान, आखाड्यामध्ये दोनशे रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत रोख बक्षीसे विजेत्या पहिलवानांना देण्यात आली. आखाडा यशस्वी होण्यासाठी माजी सभापती गिरीश पवार, साहेबराव पवार, सचिव शशिकांत दाते, दीपक पवार, हनुमंत पवार, प्रताप पवार, पुंडलिक भुजबळ, अरुण पवार, सतीश पवार आदींनी परिश्रम घेतले.