शिक्रापूर, (वार्ताहर) – शिरूर तालुक्यात सध्या बैलागाडा शर्यती जोर धरत असताना अनेक ठिकाणी प्रचार यंत्रणा देखील जोरात सुरू झालेली असताना सूर्याने देखील आग ओकल्याने तापमानाने चाळीसी पार केल्याने त्याचा परिणाम बैलगाडा घाटात होऊन बैलगाडा शर्यतीवर उन्हाचे सावट पसरून बैलगाडा घाटात शुकशुकाट पसरत आहे.
वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील भैरवनाथ देवाच्या उत्सवाच्या निमित्ताने नुकतेच ५ मे २०२४ रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असताना बैलगाडी शर्यतीसाठी लाखो रुपयांचे बक्षीस देखील ठेवण्यात आलेले होते. सकाळपासून बैलगाडा घाटात नागरिकांनी गर्दी केलेली असताना बैलगाडा घाट देखील मोठ्या गर्दीने भरून गेलेला होता.
दिवसभरात शेकडो बैलगाडा मालकांनी त्यामध्ये सहभाग नोंदवला होता. मात्र, दुपारी बारानंतर तापमानाचा पारा चाळीसच्या वर गेल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होऊ लागल्याने अनेकांनी झाडाखाली जाऊन बसणे तसेच घरी जाणे पसंत केल्याचे दिसून आले. त्यामुळे घाटात शुकशुकाट पसरला.
काही गाडामालकांनी सुद्धा बैलांना आराम देत घरी नेणे पसंत केले, तर बैलगाडा घाटामध्ये जास्त गर्दी असल्यास घाटाचा बोळ रिकामा व सरळ दिसत असल्यामुळे बैल देखील मोठ्या जोशाने पाळतात. मात्र, घाट रिकामा दिसल्यास त्याचा परिणाम बैलांच्या पाळण्यावर देखील होत असल्याचे काही बैलगाडा मालक व बैलगाडा शौकीनांनी सांगितले.
उन्हामुळे गर्दी नाही…
पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यतीसाठी आम्ही जात असतो. मात्र, आज उन जास्त असल्याने मोठी उष्णता जाणवत असल्याने वढू बुद्रुकच्या यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडा घाटामध्ये नागरिकांनी गर्दी नसल्याने सरावासाठी बैले पळवल्याची स्थिती निर्माण झाली असल्याचे बैलगाडा शौकीन अमीर शेख, नाना मांदळे, अजीज शेख यांनी सांगितले.