वाल्हे, (वार्ताहर) – पिंगोरी (ता.पुरंदर) परिसराला सुजलाम् सुफलाम् करणार्या जय गणेश जलाशयात आज अखेर 19 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी एप्रिल महिन्यात 65 टक्के पाणीसाठा या जलाशयात उपलब्ध होता. मागील वर्षांपेक्षा 46 टक्के कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत जलाशयाच्या पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने, यावर्षी शासनाचा 1 टँकर, व श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्ट यांच्या 1 टँकर यांच्या माध्यमातून पिंगोरी व परिसरातील नागरिकांची तहान भागवली जात असल्याची माहिती सरपंच संदीप यादव यांनी दिली.
पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि पिंगोरी ग्रामस्थांच्या श्रमदानातून पुनर्जीवित करण्यात आलेला जय गणेश जलाशयफ मागील तीन वर्षांपासून अल्प पर्जन्यमान असताना देखील पिंगोरीकरांची तसेच आडाचीवाडी, वाल्ह्याच्या काही वाड्या-वस्त्यांची तहान भागवत होता. या जलाशयामुळे दुष्काळग्रस्त, पिंगोरी जलयुक्त पिंगोरी झाली होती.
मागील काळात पिंगोरीसह आडाचीवाडी व वाल्हेच्या वाड्या-वस्त्यांसाठी हा जलाशय जीवनदायी ठरला आहे. मागील काही वर्षांपासून, ऑगस्ट महिन्यातच जर गणेश जलाशयात पूर्ण क्षमतेने भरून वाहत होता. मात्र, गतवर्षी अतिअल्प प्रमाणात पाऊस झाल्याने जय गणेश जलाशयात पाणीसाठा अल्प प्रमाणात झाला होता. यामुळेच सद्यःस्थितीत पावसाचे माहेरघर असलेल्या पिंगोरी खोर्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
जय गणेश जलाशयात पाणीसाठा अतिअल्प प्रमाणात उपलब्ध असल्याने, पिण्याच्या पाण्यासह, जनावरांचा चारा, जनावरांना पिण्याचे पाणी, बागायतीसह जिरायती शेतीचे नुकसान मोठ्याप्रमाणात झाले असून, अद्यापपर्यंत शासनाकडून, कोणतीही उपाययोजना दुष्काळा संदर्भात केलेली नाही.- निलेश शिंदे, शेतकरी, पिंगोरी
मागील वर्षी जय गणेश जलाशयात एप्रिल महिन्यांत 65 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र, मागील वर्षी पावसाळ्यात पाऊस अतिअल्प प्रमाणात पडल्याने, या जलाशयात पाणी कमी प्रमाणात आले होते. यामुळे यावर्षी सद्यःस्थितीत फक्त 19 टक्केच पाणीसाठाउपलब्ध आहे. – अविनाश जगताप, शाखाधिकारी गराडे, पाटबंधारे शाखा