वाल्हे (वार्ताहर)- मागील महिन्यांपासून उन्हाची तीव्रता अधिक वाढत असून याचा फटका माणसांप्रमाणे, पशु – पक्षी, प्राण्यांना, देखील बसत आहे. वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले असून उन्हामुळे कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. मागील वर्षी १ हजार पक्षामागे ६ ते ८ कोंबड्याचा मृत्यू होत होता.
यावर्षी यामध्ये वाढ होऊन दिवसाकाठी १० ते १२ कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. यावर्षी वातावरणात मोठा बदल झाला असून दररोज किमान एक हजार पक्षांमागे १० ते १२ कोंबड्या रोज मृत्युमुखी पडत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
मागील काही दिवसात अंगाची लाही-लाही होत आहे. यंदाचा उन्हाळा अधिकच तापदायक ठरत आहे. पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागातील तापमान काही ठिकाणी वाढले असून याचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. सोबतच याचा फटका सध्या पोल्ट्री व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. उष्माघाताने कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे व्यवसायिकांची चिंता वाढली आहे.
तापमान ४० अंशाच्या जवळपास गेल्याने कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहेच, सोबतच अंडी उत्पादनातही घट झाली आहे. कोंबड्याचे वजन वाढत नाही.
दरम्यान, उन्हापासून कोंबड्यांचे संरक्षण व्हावे म्हणून वाल्हे परिसरातील व्यावसायिकांनी पोल्ट्री फार्मच्या छतावर गवत, उसाचे पाचट, नारळाच्या फांद्याही अंथरल्या आहेत. आता जागोजागी फोगर, स्पिंकर्लर, फॉन, कुलर आदी उपाययोजना केल्याने कोंबड्यांचे मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात कोंबड्यांची मागणी घटते. त्यामुळे कंपनीकडून पक्षांची उचल वेळेत होत नाही. त्याचा फटका व्यावसायिकांना बसत आहे. “अति उष्णतेने पक्षाचे वजन घटत आहे. दिवसा प्रचंड ऊन असल्याने या संमिश्र वातावरणाचाही परिणाम होत असून सकाळी ८ पासून ते दुपारी ४ पर्यंत उन्हाचा कडाका आहे.
वाढणारी उष्णता प्रचंड असल्याने कोंबडी पिल्ले फार नाजूक असतात त्यांना उष्णतेची झळ सहन होत नाही. त्यामुळे दिवसभर पोल्ट्रीमध्ये फॅन लावणे, सतत शेडवर पाणी फवारणी करावी लागत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता कोंबड्यावर वैद्यकीय उपचारांचा खर्च वाढला आहे.
या समस्या निर्माण होत असल्यामुळे परिणामी कोंबड्यांचे वजन कमी भरत आहे. यामधून उत्पन्न कमी आणि खर्च अधिक वाढल्याने व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे” – सत्यवान सूर्यवंशी, पोल्ट्री व्यावसायिक, वाल्हे.
“उष्णतेपासून पक्षांची काळजी घेण्यासाठी अनेक व्यावसायिकांनी शेडमध्ये फॉगरची सुविधा केली आहे. शेडमध्ये पंखा, कुलर, फॉगरची, स्पिंकर्लर आदी केलेले प्रयत्न वाया जात आहेत. भारनियमन वाढल्याने जनरेटर सुरू करावा लागत आहे. यात डिझेलचा खर्च वाढत आहे. जनरेटर सुरू करेपर्यंत उष्णता वाढत आहे.”. -विनय पवार, पोल्ट्री व्यावसायिक, आडाचीवाडी.