पिंपरी – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप झाला… त्याचे धक्के सर्वत्र जाणवत होते… साडे तीन वर्षांत अजित पवार यांनी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या अचानक मिळालेल्या धक्क्याचा सर्वाधिक प्रभाव सोशल मीडियावर जाणवत होता. या नव्या राजकीय भूकंपाने सोशल मीडियावर मीम्सचा आणि वेगवेगळ्या पोस्ट्सचा अक्षरश: पूर आला.
रविवार दुपारपासून सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्म बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने पोस्ट पडत होत्या. त्यात राजकीय नेत्यांच्या एकमेकांविरोधीतील जुन्या क्लिप्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होत्या. त्यात प्रामुख्याने आम्ही राष्ट्रवादीसोबत कधीच जाणार नाही, ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची क्लिप व्हायरल होत होती. तर त्याच्या तोडीला त्यांच्या समर्थकांकडून मी कुणीच्या भानगडीत पडत नाही आणि पडलो तर त्याला सोडत नाही ही क्लिप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. त्यासोबतच राज ठाकरे यांचे जुने भाषण “एकला चलो रे’ची क्लिप व्हायरल होत आहे. त्याचप्रमाणे इंदुरीकर महाराजांचे कार्यकर्त्यांवर लय वाईट दिवस ही क्लिप व्हायरल होत होती.
या घटनेनंतर नेटकऱ्यांचे टॅलेंट, कल्पनाशक्ती उफाळून आले होते. कुणी तरी येणार येणार ग… या गाण्यावर मोठ्या प्रमाणात रील्स पोस्ट करण्यात आल्या होत्या. तसेच काही जण रोष तर काही जण या घटनाक्रमावर विनोद करत होते. नेते मंडळी कधीही एकमेकांसोबत हात मिळवू शकतात. परंतु सोशल मीडियावरील त्यांच्या कट्टर समर्थकांना मात्र बाजू सावरुन धरताना घाम निघतो. आपल्या विरोधी समर्थकाने केलेल्या जुन्या पोस्टवर जाऊन त्यांचे नेटकरी मित्र कमेंट करत खिजवत होते.
“मतदान कार्ड विकणे आहे’
सोशल मीडियावरील सर्वाधिक पोस्ट झालेल्या पोस्टपैकी “मतदान कार्ड विकणे आहे,’ ही पोस्ट सर्वांत पुढे असल्याचे दिसून येत होते. त्यासोबतच “महाराष्ट्रातील एकाही मतदाराचे मत वाया गेले नाही, ज्याला ज्याला मतदान केले त्याने सरकार बनवलं.’ अशी एक पोस्ट गुदगुल्या करत होती. समृद्धी महामार्गावरील अपघातावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या समर्थकांनी शनिवार “देवेंद्रवासी’ हा शब्द ट्रेंडिंगला आणला होता.
काल त्यावरुन भाजप समर्थकांनी “राष्ट्रवादी देवेंद्रवासी झाली…’ अशा पोस्ट करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या समर्थकांना डिवचले. “भर दुपारी पहाट झाली पुन्हा…आधी पहाटेची झोप घालविली आणि आता रविवारच्या दुपारची झोप मोडली…’ “साहेबांनी भाकरी फिरवली..दादा पिठाचा डब्बाच घेऊन फरार’ या पोस्ट्स विनोदी वातावरण निर्माण करत होते. तर देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसोबत “निकाल काहीही येवो, आपल काय बिघडत नाय…’ तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोसोबत “सासूमुळे वाटणी केली आणि सासूच वाटणीस आली…’ “पहाटे ज्यांना पाहते आले नाही, त्यांच्यासाठी पुन्हा भर दुपारी…’ “निवडणूक आयोगाकडे नम्र विनंती यापुढे बोटाला शाई नाही चुना लावा’ ही पोस्टही व्हायरल झाली.