नवी दिल्ली – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) चे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले आपल्या हास्यकवितांसाठी नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या हास्यविनोदामुळे संसदभवनातही खेळीमेळीचे वातावरण निर्माण होते.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘हम दो, हमारे दो’ या वक्तव्यावर रामदास आठवले यांनी फिरकी घेतल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत.
राहुल गांधी यांनी नुकतेच संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोंदीवर निशाना साधत म्हटले होते की, देशात सर्व काही ‘हम दो, हमारे दो’ साठीच आहे.
या वक्तव्यावर रामदास आठवले यांनी राहुल गांधींना एक सल्ला दिला आहे की, ‘हम दो, हमारे दो’ हा नारा कुटुंब नियोजनासाठी वापरला जातो. जर राहुल गांधी याचा प्रचार करू इच्छित असतील तर त्यांनी लग्न करणे गरजेचे आहे.
आठवले पुढे म्हणाले की, त्यांनी दलित मुलीसोबत लग्न करावे आणि जातियता संपवण्याचे महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण करावे. त्यामुळे युवकांनाही प्रेरणा मिळेल.
राहुल गांधी यांनी 11 फेब्रुवारीला संसदेत केलेल्या भाषणात नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला होता. या वेळी ते म्हणाले होते, एक वेळ ‘हम दो, हमारे दो’ हा क्युट लोगो होता, यात छान छान मोठे चेहरे होते. आता मात्र देशात सर्व काही ‘हम दो, हमारे दो’साठीच केले जात आहे.’
राहुल गांधी म्हणाले होते, आज केवळ चार लोकच संपूर्ण देश चालवत आहे. पंतप्रधान देशाला ‘हम दो, हमारे दो’ या सिद्धातांनुसार चालवत आहे. मात्र राहुल यांनी कोणाचेही नाव घेतले नव्हते. फक्त ऐवढेच म्हटले होते की, ती नावे सर्वांना माहीत आहे.