नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र भारत हे लक्ष्य गाठू शकतो का असा प्रश्न रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की भारताच्या भक्कम आर्थिक विकासाबाबत जो प्रचार केला जातो आहे त्यासंदर्भात मोठी चूक होते आहे. देशात अनेक मूलभुत समस्या आहेत त्यावर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. शिक्षण आणि कामगारांच्या कौशल्यात सुधारणा घडवून आणणे हे आताचे सगळ्यांत मोठे आव्हान आहे.
ब्लूमबर्गशी चर्चेत रघुराम राजन यांनी असाही दावा केला की असंख्य मुलांना हाय स्कुलपर्यंतचेही शिक्षण मिळत नाही आणि विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक असेल तर २०४७ पर्यंत भारत विकसित होऊ शकत नाही. अशा स्थितीत या लक्ष्यपूर्तीबाबत बोलणेही निरर्थक आहे. आपल्याकडची वाढती श्रमसंपदा अथवा वर्क फोर्स तेंव्हाच लाभ देणारी ठरू शकते जेंव्हा या कामगारांना चांगला रोजगार मिळेल. मला वाटते आपण याच संभाव्य अडचणीचा सामना करत आहोत.
करोना महामारीनंतरच्या काळात मुलांच्या आकलनाच्या क्षमतेत घट झाली असल्याच्या काही अभ्यासकांच्या अहवालाचा हवाला देत राजन म्हणाले, सर्वप्रथम देशातील जी श्रमशक्ती आहे ती काम प्राप्त करण्यास लायक बनवण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यावर आपल्याला भर द्यावा लागेल.
मोदी सरकारच्या धोरणांबाबत सूचकपणे प्रश्न उपस्थित करताना रघुराम राजन म्हणाले की अगोदर देशातील शिक्षण प्रणाली दुरूस्त करण्याऐवजी सरकारचा फोकस उत्पादन क्षेत्रासारख्या हाय प्रोफाइल प्रोजेक्टवर आहे. आपण व्यवहारिक दृष्टीकोन ठेवण्याची आवश्यकता आहे. चीनचे डेंग जीयाओपिंग यांचे एक विधान उदधृत करताना राजन म्हणाले की भारत चीनकडून सगळे शिकतो, मात्र भारताला हे समजले पाहिजे की मांजर काळी आहे की पांढरी हे महत्वाचे नाही. ती उंदीर पकडू शकते का हे सगळ्यांत महत्वाचे आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर येणाऱ्या नव्या सरकारला शिक्षण आणि कौशल्यावरच भर द्यावा लागणार आहे. अन्यथा आपल्या तरूण मनुष्यबळाचा काहीच लाभ होणार नाही. देशाची अर्थव्यवस्था रूळावर आणायला आपल्याला बरेच वर्ष कठोर परिश्रम करावे लागले. मात्र राजकीय व्यक्तींकडून त्याचा सध्या जो प्रचार सुरू आहे ती त्यांची गरज आहे. मात्र अन्य भारतीय नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवणे ही त्यांची चूक ठरेल.