नवी दिल्ली – मार्च महिन्यात आतापर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सुमारे 38 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र जानेवारीपासून आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारापेक्षा कर्जरोख्यात जास्त गुंतवणूक केली आहे.
या सदर्भातील आकडेवारीनुसार जानेवारीपासून आतापर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात 13,893 कोटी रुपयांचे गुंतवणूक केली. त्या तुलनेत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी आतापर्यंत कर्जरोखे बाजारात 55,480 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणूकदारांना भारतातील कर्जरोखे बाजार जास्त आकर्षक वाटत आहे. आगामी काळातही हे गुंतवणूकदार भारतातील कर्जरोखे बाजारात जास्त गुंतवणूक करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मार्च महिन्यात आतापर्यंत या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात तब्बल 38 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र फेब्रुवारी महिन्यात या गुंतवणूकदारांनी केवळ 1,539 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. जानेवारी महिन्यात या गुंतवणूकदारांनी 25,743 कोटी रुपयांची गुंतवणूक भारतीय बाजारातून काढून घेतली होती.
आता या गुंतवणूकदारांची शेअर बाजारातील गुंतवणूक वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जागतिक बाजारात व्याजदर कपातीची शक्यता निर्माण झाली आहे. भारतातील स्थूल अर्थव्यवस्था उत्तम असल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय शेअर बाजार पुन्हा आकर्षक वाटू लागले असल्याचे दिसून येते.
मार्च महिन्यामध्ये भारतीय शेअर बाजारात बरेच करेक्शन झाले आहे. मिड कॅप आणि स्मॉल कॅप फुगले असल्याचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे मिड कॅप व स्मॉल कॅपबरोबरच मुख्य निर्देशांकाशी संबंधित कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली आहे. याचा फायदा भारतातील गुंतवणूकदाराबरोबरच परदेशी संस्थागत गुंतवणूकदारही घेत असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे मार्च महिन्यामध्ये परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक वाढली असल्याचे काही विश्लेषकांनी सांगितले. दरम्यानच्या काळात रिझर्व्ह बँकेने भारताचा विकासदर आणखी वाढत राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीमध्ये आता गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना दीर्घ पल्ल्यात भारतातून जास्त परतावा मिळू शकतो असे समजले जाऊ लागले आहे.
भारत सरकारच्या कर्जरोख्याचा समावेश जागतिक पतमानांकन संस्थांच्या यादीवर नव्हता. आता दोन पतमानांकन संस्थांनी भारतातील कर्जरोख्याचा समावेश या यादीवर केला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून भारतीय कर्जरोखे बाजारात परदेशी गुंतवणूक वाढत आहे. प्रत्यक्ष या यादीत भारताचा समावेश झाल्यानंतर जवळजवळ 40 अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.