गोनवडीतील आंबा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा
मंचर – जिवापाड जपलेली आंब्याची 30 झाडे निसर्ग चक्रीवादळामुळे डोळ्यासमोर उन्मळून पडली. झाडांचे आंबे गळून खाली पडले. वर्षभराचा खर्च कसा भागवणार. फळपिकांच्या नुकसानीची रक्कम बाजारभावाप्रमाणे द्या, अशी मागणी गोनवडी (ता.आंबेगाव) येथील आंबा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री वळसे पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे केली आहे. तर लवकरच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही वळसे पाटील यांनी दिली.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील घोडेगाव परिसरातील गोनवडी, आमोंडी, कोलदरे,गंगापूर बुद्रुक, शिनोली येथे चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतीची व इतर नुकसानीची पाहण वळसे पाटील आणि खासदार डॉ. कोल्हे यांनी रविवारी (दि. 7) केली. त्यावेळी गोनवडी येथील नुकसानग्रस्त शेतकरी मुरलीधर दौंड, ज्ञानेश्वर दौंड, शिवाजी गुळवे, भरत काळे यांनी आपली व्यथा लोकप्रतिनिधींपुढे मांडली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका कृषी अधिकारी टी. के. चौधरी, अक्षय काळे, गोरक्ष मंडलीक उपस्थित होते.
मंत्री वळसे पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार व मी स्वतः मिटींग घेऊन आंबा, हिरडा, टोमॅटो, पपई या फळांच्या पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. पॉलीहाऊस, शेडनेटसाठी भरपाई दिली जाईल. तालुक्यातील सर्व बाधितशेतीचे पंचनामे तहसीलदार व कृषीअधिकाऱ्यांनी त्वरीत करावे, अहवाल प्राप्त होताच रकमेसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
- 2015च्या जीआरमध्ये दुरुस्ती करणार
नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम वाढवून देण्यासाठी 2015 च्या जी. आर. मध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मंत्री वळसे पाटील दिली.