नीरा नरसिंहपूर – महाराष्ट्रात पुराने थैमान घातले आहे, जागोजागी जनतेचे बेमाप नुकसान झाले असून काहींना जीव गमवावा लागला आहे. पण, सरकार मात्र मदत देतानाही अटी व नियम घालत आहे. हे सरकार इतके असंवेदनशील कसे असू शकते, याचे आश्चर्य वाटते, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथे आज पूरस्थितीची पाहणी बारामतीच्या खासदार सुळे यांनी केली. यादरम्यान सुळे बोलत होत्या. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, अप्पासाहेब जगदाळे, दशरथ माने, अशोक घोगरे, जि. प. सदस्य अभिजित तांबिले, महारुद्र पाटील, श्रीकांत बोडके, संतोष सुतार, कमलेश दिंगरे, तहसीलदार सोनाली मेटकरी त्याचबरोबर तालुक्यातील अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
खासदार सुळे म्हणाल्या की, राज्यामध्ये इतकी मोठी नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे आणि सरकारमधील मंत्रीगण मात्र फोटो घेऊन ते सोशल मीडियावर पाठवून त्याचा यथेच्छ आनंद घेत आहेत. तसेच सरकारकडून पूरग्रस्तांना मदत देतानाही अटी व नियम घातले जात आहेत. सांगली, साताऱ्यात जेवढी मदत द्यायला हवी तेवढी मिळत नाही.
सुळे म्हणाल्या की, 1993 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी लातूरमध्ये भूकंप झाला; त्यावेळी सगळी कामे बाजूला ठेऊन लातूरमध्ये मुक्कामी थांबून तिथल्या परिस्थितीत सुधारण्यासाठी प्रयत्न केले. आजही राज्यभरातील जनतेला साहेबांचे हे काम आठवते, त्यांनी हाताळलेल्या स्थितीची आजही चर्चा होते.परंतु , या सरकार सारखे असंवेदनशील सरकार आजपर्यंत कुणीही पाहिले नाही. आम्ही आमच्या मार्फत शक्य तेवढी मदत पूरग्रस्तांसाठी पुरवण्यासाठी सज्ज आहोत. स्वतः पवारसाहेब आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. त्याचबरोबर पुरामुळे लोकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई व शासकीय मदत प्रत्येक बाधितला मिळावी, यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी तातडीने कामाला लागावे, अशा सूचनाही खासदार सुळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.