Farmers Suicide : शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच असल्याचे पुन्हा एकदा आकडेवारीतून समोर आले आहे. राज्य सरकारने विधिमंडळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2023 पर्यंतची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. या 10 महिन्याच्या काळात तब्बल 2478 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सर्वाधिक आत्महत्या अमरावती भागात झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, हवामानातील बदल, शेत मालाला भाव नसणे ही आत्महत्येची प्रमुख कारणे समोर येत आहेत.
जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, अमरावती विभागात 951, छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागात – 877, नाशिक विभागात – 254, नागपूर विभागात – 257, पुणे विभागात – 27, लातूर जिल्हा – 64, धुळे जिल्हा – 28. अशा एकूण 2478 शेतकरी आत्महत्येची प्रकरणं राज्यभरातून समोर आली आहेत. लेखी उत्तरात राज्य सरकारकडून ही माहिती देण्यात आली आहे.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना समुपदेशनाची व प्रबोधनाची आवश्यकता विचारात घेऊन विविध उपाययोजना राबवल्या जातात. विशेष मदतीच्या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्य विकासासाठी “कृषी समृध्दी” योजनेच्या अनुषंगाने विविध विभागांकडून उपाययोजना करण्यात येत आहेत.
शेतमालाला हमीभाव, PM-KISAN योजनांमार्फत शेतकऱ्यांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न. महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना. केवळ1 रूपया भरून पिक विमा योजनेचा लाभ. राज्य शासनाकडून प्रतिवर्ष रुपये 6000 शेतकऱ्यांना देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून अथवा वेळ प्रसंगी राज्य शासनाच्या निधीतून निकषाबाहेर मदत दिली जाते, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान, वाढती महागाई, वाढत्या गरजा यांचा विचार करता शेतकऱ्यांना शेतीतील उत्पन्नावर जीवन जगणे कठीण होत चालले आहे. शासनाकडून वरील योजना राबविल्या जात असल्या तरीही शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अधिकाधिक योजना राबविणे गरजेचे आहे.