ताटातून कांदा गायब; कांदा भजीऐवजी ग्राहकांचे कोबी भजींवर समाधान
बुध – कांद्याचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांच्या ताटातील कांदा गायब झाला आहे. हॉटेल व्यावसायिक, खानावळीतदेखील ताटात कांदा देणे बद केले आहे. कांद्याऐवजी कोबीला प्राधान्य दिले जात आहे. मोठ्या हॉटेलमध्ये मागणीनुसार कांदा दिला जात आहे. कांदा सोडून काहीही मागा, अशी दरवाढीमुळे ग्रासलेले हॉटेल चालक विनंतीच करत असल्यामुळे खवय्यामध्ये नाराजीचे चित्र दिसत आहे.
यंदा अतिपावसामुळे कांद्याचे पीक वाया गेले. नवीन कांद्याला पावसाचा फटका बसल्याने उत्पन्न घटले असून दर्जाही खालावला आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक घटून दरात तेजी आली आहे. त्यामुळे एरव्ही दहा ते तीस रूपये किलो मिळणाऱ्या कांद्याचे दर सध्या किरकोळ बाजारात शंभरावर पोहोचले आहेत. कांदा दरवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने कांदा आयातीला परवानगी दिली असली तरी मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात आयात होत असल्याने कांद्याच्या दरातील तेजी वाढत आहे.
इतर पदार्थांच्या तुलनेत मिसळबरोबर कांदा खाण्याचे प्रमाण जास्त असते. मागील काही महिन्यांपासून कांद्याचे दर वाढले असले तरी नाईलाजास्तव गिऱ्हाईकाला मिसळीबरोबर कांदा दयावा लागत आहे. मिसळच्या दरात वाढ करून गिऱ्हाईकांवर परिणाम होऊ शकतो. कांद्याचे दर लवकर कमी न झाल्यास व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया अनेक व्यावसायिकांनी दिली. सध्या खवय्यांना कांदा भजीऐवजी कोबी भजी खावी लागत आहे. तर अनेक हॉटेलचालकांनी कांदा भजी बनविणे बंद केली आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून कांद्याबरोबर लसणाचे भावही तेजीत आहेत. कांदा आणि लसणाचा बहुतांश सर्वच भाज्यांमध्ये वापर केला जातो. भाजीमध्ये लसूण कांद्याचा वापर करताना गृहिणीना हात आखाडता घ्यावा लागत आहे. खानावळ, उपहारगृह, पाणीपुरी, हातगाडी व्यावसायिकांसह हॉटेल चालकांनाही महागाईचा मोठा फटका बसला आहे. पाणीपुरी, मिसळ, पावभाजीसोबत आता जास्तीचा कांदा दिला जात नसून केवळ काकडी, गाजर, बीटचा वापर वाढला आहे.