राजगुरूनगर – वेताळे (ता. खेड) येथील चासकमान धरणाच्या डोंगरावर चरत असणाऱ्या जनावरांमधील वासराला बिबट्याने ठार केल्याची घटना सोमवारी (दि. 16) घडली.
वेताळे येथील डोगर परिसरात सोमवारी योगेश बोंबले यांनी पहाटे जनावरे 15 चरावयास सोडली होती. दुपारी गोठ्याकडे जनावरे आल्यानंतर वासरु नसल्याचे लक्षात आले. शोध घेतल्यानंतर वासरावर बिबट्याने हल्ला केल्याचे समजले.
आठवड्यापूर्वी वन्य श्वापदाने संतोष शिंदे यांचेही गायीचे वासरु फस्त केले होते. परिसरात एक बिबट्या आणि बछडे पाहिल्याचे प्रत्यक्षदर्शनीनी सांगितले. 15 दिवसांपूर्वी दोन शेळ्यावर बिबट्याने हल्ला करून जखमी केल्या होत्या. शिंदेदरा परिसरातील डोंगरावर महिनाभरात चार जनावरांवर हल्ले झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
रात्री बागायती पिकांना पाणी भरणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. पिंजरा लावण्याची मागणी केली जात आहे. चास कमान धरण परिसरात या घटनास्थळाला वनपाल प्रदिप कासारे, वनरक्षक सूर्यकांत कदम यांनी भेटी देऊन पाहणी केली असता बिबट्याच्या वास्तव्य असल्याचे लक्षात आले.