पुणे – आयसीसी एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा यंदा भारतात होत आहे. ज्या 10 शहरांमध्ये या स्पर्धेचे सामने होणार आहेत, त्या दिवसांचे हॉटेल बुकिंग आतापासूनच सुरू झाले असून आता त्याच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पोहोचल्या आहेत. ज्या हॉटेलची एक रूम सामान्य दिवशी 6 ते 7 हजार रुपये दराची असते तिच रूम आता सामन्यांच्या दिवशी तब्बल 50 हजार रुपयांना घ्यावी लागत आहे. त्यामुळे श्रीमंतांसाठीच हे सामने थेट मैदानांवर जाऊन पाहणे शक्य होणार असून सर्वसामान्यांना मात्र, आपल्या घरातील टीव्हीवरच त्याचा आनंद लुटावा लागणार आहे.
केवळ मुंबईच नव्हे तर अहदमाबाद व पुण्यासह एकूण 10 शहरांत थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती दिसत आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील स्टेडियमच्या जवळ असलेल्या अनेक हॉटेल्सनी आतापासूनच नवे दर लागू केले असून प्रत्यक्ष सामन्याच्या दिवशी तसेच एक दिवस आधी व एक दिवस नंतर दरामध्ये प्रचंड वाढ केली आहे. अहमदाबादमध्ये तर परिस्थिती अत्यंत अविश्वसनीय बनली आहे. 15 ऑक्टोबरला येथे भारत व पाकिस्तान यांच्यातील सामना होत आहे. अ दर्जाच्या हॉटेलचा दरही 20 हजार रुपये दररोज असे झाले आहेत.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 1 लाख 32 हजार इतकी आहे. त्यातही या सामन्यासाठी राज्यातीलच नव्हे तर संपूर्ण देश परदेशातूनही प्रेक्षक येणार आहेत. मंगळवारी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाल्यावर लगेचच अनेकांनी ऑनलाईन हॉटेल बुकिंग सुरू केल्याचे चित्र असून एकेका हॉटेलचे एका रात्रीचे शुल्क पाहून सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होतील, अशी स्थिती बनली आहे. याच मैदानावर 19 नोव्हेंबरला अंतिम लढतही रंगणार आहे. त्यासाठीही सामान्य हॉटेल्ससह विविध पंचतारांकित हॉटेल्सनीही आपल्या दरात प्रचंड वाढ केली आहे.
अहमदाबादला झुकते माप
गुजरातमधील अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम या स्पर्धेतील जास्त सामने आयोजित करत आहे. त्यातच भारत व पाकिस्तान यांच्यातील लढतीसह अंतिम लढतही याच मैदानावर होणार आहे. केवळ प्रेक्षक क्षमता जास्त असल्याचे कारण देत याच मैदानाला महत्त्वाच्या सामन्यांसाठी झुकते माप का देण्यात येत आहे, असा सवालही अनेक राज्य संघटनांनी केला आहे.
आयसीसीने टोचले पाकचे कान
भारतात एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेसाठी येणार का, असा प्रश्न पाकिस्तान संघाबाबत निर्माण झाला होता. त्यातच पाकिस्तान सरकारने परवानगी दिली तरच संघ पाठवला जाईल अशी भूमिका पाकिस्तान क्रिकेट मंडळाने घेतली होती. मात्र, आयसीसीने पाक मंडळाचे कान टोचले असून कोणत्याही स्थितीत पाक संघाला भारतात या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी यावेच लागेल, असा इशारा दिला आहे. आयसीसी प्रत्येक मोठ्या स्पर्धेसाठी प्रत्येक संलग्न देशाशी करार करते असाच करार पाक मंडळाशीही झालेला आहे. त्यामुळे पाक मंडळ करार पाळेल, अशी आशाही आयसीसीने व्यक्त केली आहे.
अनेक राज्य संघटनांची नाराजी
आयसीसीने विश्वकरंडक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करताना बीसीसीआयच्या समन्वयाने देशातील 10 शहरे निश्चित केली. मात्र, त्यात इंदूर, रांची, मोहाली, नागपूरसह अन्य अनेक शहरांना सामन्यांचे आयोजन दिलेले नाही. त्यामुळे पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांनी बीसीसीआयच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. अहमदाबाद, हैदराबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बंगळुरू, मुंबई व कोलकाता याच शहरांत या स्पर्धेचे सामने होणार असून अनेक राज्यांतील सामन्यांच्या केंद्रांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे अनेक राज्य संघटनांनी नाराजीचा सूर लावला आहे.
आयर्लंड दौराही निश्चित
भारताचा अयर्लंडचा दौराही बीसीसीआयने निश्चित केला आहे. या मालिकेत भारतीय संघ तीन टी-20 सामने खेळणार आहे. हे सामने येत्या 18, 20 व 23 ऑगस्ट रोजी होणार असून अद्याप या मालिकेसाठीचा भारतीय संघ घोषित करण्यात आलेला नाही. मालिकेतील सर्व सामने मालाहाईड येथे होणार आहेत.