लोणावळा, दि. 18 – पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर एका कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. एक महिला या अपघातात सुदैवाने सुखरूप बचावली आहे. खंडाळा बोर घाटात किलोमीटर क्र. 37 जवळ गुरुवारी (दि. 17) रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
या अपघातात अब्दुल रहमान खान (वय 32, रा. घाटकोपर), अनिल सुनील सानप, वसीम साजिद काझी (रा. राजापूर, जि. रत्नागिरी), राहुल कुमार पांडे (वय 30, रा. कामोठे, नवी मुंबई), आशुतोष नवनाथ गाडेकर (वय 23, रा. म्हातारपाडा, मुंबई) व अमीरउल्ला चौधरी या सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर चालक मच्छिंद्र आंबोरे (वय 38) आणि दीपक खैराल हे जखमी झाले असून अस्फीया रईस चौधरी (25, कुर्ला, मुंबई) या सुखरूप बचावल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून मुंबईकडे जाणारी इर्टीका कार (क्र. एमएच 14 इसी 3501) मध्ये चालकासह एकूण नऊ प्रवासी होते. सर्व प्रवासी हे वेगवेगळ्या ठिकाणाहून मुंबईकडे जाण्यासाठी कारमधून प्रवास करत होते. ही कार पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर ढेकू गावच्या हद्दीत किलोमीटर 37.00 येथे आली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कारची अज्ञात वाहनाला मागून धडक बसली. धडक एवढी जोरदार होती की त्यामध्ये प्रवास करणाऱ्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. एक महिला किरकोळ जखमी झाली असून, चार जणांना गंभीर इजा झाल्या कारणाने एमजीएम रुग्णालय कामोठे येथे नेण्यात आले. त्यादरम्यान त्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
हा अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाला असून, अपघातस्थळी खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, पोलीस निरीक्षक शिरीष पवार, पोलीस उपनिरीक्षक योगेश भोसले यांनी भेट दिली.