केंद्राच्या नव्या सूचनेनुसार सवलत
पुणे – करोनाचे रुग्ण शहरात वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर साथीला अटकाव घालण्यासाठी केंद्र शासनाने लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे सक्तीने विलगीकरण (क्वारंटाईन) करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पालिकेकडून शहरात जवळपास 3 ते 4 हजार जणांचे विलगीकरण केले आहे. मात्र, आता केंद्र शासनाने विलगीकरण संदर्भात नवीन आदेश दिले असून ज्या व्यक्तीची घरे मोठी आहेत. तसेच, घरीच विलगीकरणास तयार असतील अशा व्यक्तींना हमीपत्र घेऊन घरी सोडण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी ही माहिती दिली.
शहरात सुरुवातीच्या काळात करोनाची लागण झालेले रुग्ण परदेशातून आलेले व्यक्ती आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना झाली होती. त्यामुळे रुग्णांची संख्या कमी होती. त्यामुळे परदेशातून आलेल्या व्यक्तींना हातावर शिक्के मारून घरीच विलगीकरण केले जात होते. तर, लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे विलगीकरण केले होते. त्यानंतर रुग्ण वाढण्यास सुरुवात होताच 21 मार्चपासून परदेशातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला दोन दिवसांचे सक्तीचे विलगीकरण करण्यात आले.
मात्र, आता शहरात दररोज लागण होणाऱ्या रुग्णांचा आकडा 100 वर गेला असल्याने पालिकेने मागील दोन आठवड्यांपासून संस्थात्मक विलगीकरण सक्तीचे केले आहे. त्यात, करोनाची बाधा झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील सरसकट सर्वांनाच संस्थात्मक विलगीकरण केले जात आहे. त्यासाठी पालिकेने सणस मैदान येथील क्रीडा वसतिगृह, सिंहगड रस्त्यांवर लायगुडे दवाखाना, बालेवाडी येथील क्रीडा संकुल, अभियांत्रिकी महाविद्यालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण कक्षाची सोय केली आहे.
त्यामध्ये तब्बल 3 ते 4 हजार जणांचे विलगीकरण केले आहे. त्यांच्या जेवणाची तसेच अन्य सर्व प्रकारच्या व्यवस्था महापालिकेकडून करण्यात येत आहे.
याठिकाणी चौदा दिवस ठेवल्यानंतर त्यांची चाचणी घेऊन निगेटिव्ह अहवाल आलेल्यांना घरी सोडण्यात येते. त्यामुळे हे कक्षही ओसंडून वाहत असून प्रत्येक दोन दिवसांला नवीन कक्ष सुरू करावे लागत आहेत. त्यामुळे यंत्रणेवर ताण येत असतानाच आता पालिकेस केंद्राच्या नवीन निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
ज्या नागरिकांच्या घरातच वेगळी राहण्याची व्यवस्था आहे आणि तो जर स्वत:च्या जबाबदारीवर घरीच विलगीकरण होण्यास तयार असेल तर त्यास घरी सोडावे, असे निर्देश केंद्राकडून महापालिकेला देण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित व्यक्तींकडून हमीपत्र घेऊनच त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात येत आहेत. या निर्णयामुळे यंत्रणेवर येणारा ताण कमी होणार आहे. मात्र, त्याचवेळी ज्या व्यक्ती घरी जातील त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
– शेखर गायकवाड, आयुक्त, महापालिका