श्रीगोंदा – बांगड्या भरलेल्या महिलाच राष्ट्रवादीच्या उमेदवारास घरी बसवणार, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस यांनी केले. भाजप महायुतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या प्रचार दरम्यान काढलेल्या फेरीत त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला.खेतमाळीस म्हणाल्या शरद पवार यांनी महिलांच्या विकासासाठी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली.
महिला सामाजिक, आर्थिक सबलीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला. वेळोवेळी महिलांना योग्य न्याय मिळवून दिला. अश्या जाणता राजाने श्रीगोंदा येथील सभेत पाचपुतेंनी बांगड्या घालाव्यात, असे वक्तव्य केले. हे वक्तव्य म्हणजे संपूर्ण स्त्री जातीचा अपमानच केला. महिला बांगड्या घालतात म्हणजे त्या महिला अकार्यक्षम नसतात. स्वतःच्या स्वार्थासाठी पवारांनी महिलांचा अपमान करणे जाणता राजास शोभते का? असा सवाल त्यांनी केला.
जो उमेदवार सध्या त्यांच्या पक्षाचा उभा आहे. ते काय आहे. हे श्रीगोंद्यातील माता भगिनींना माहिती आहे. त्यामुळे पवारांनी सांगीतल्याप्रमाणे बांगड्या भरलेल्या महिलाच राष्ट्रवादीच्या उमेदवारास घरी बसवणार आहेत, हे विसरु नये. श्रीगोंद्याची पाण्याअभावी झालेली वाताहात शेतकऱ्यांचे फळबागा, ऊसाचे फड जळालेले पिके दिसले नाहीत. त्यांना घोड, कुकडी साकलाई, विसापूर हा शेतकऱ्यांशी निगडित असणारा पाणी प्रश्न दिसला नाही. पण बांगड्या कोणी भरायच्या हे सांगायला पवार विसरले नाहीत. याचे श्रीगोंद्यातील जनता मतदानातून वचपा काढल्याशिवाय राहणार नाही, असे खेतमाळीस म्हणाल्या. त्यावेळी प्रतिभाताई पाचपुते, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, माजी नगराध्यक्षा सुनीता शिंदे भाजप शहराध्यक्ष जयश्री कोथंबिरे, दिपाली औटी, ज्योती खेडकर आदी महिला उपस्थित होत्या.