पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महानपालिका हद्दीमध्ये असणार्या सर्व जाहिरात फलक धारकांनी उभारण्यात आलेल्या फलकांचे स्ट्रॅक्चर मजबूत आहे याची खातर जमा करणे गरजेचे आहे. जर स्ट्रॅक्चर कमकुवत असेल तर ते त्वरित हटविण्यात यावे.
गेल्या काही वर्षांमध्ये उन्हाळ्यात होणाऱ्या अवकाळी वादळ वाऱ्याच्या पावसात फलक कोसळून जीवित हानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे पालिकेने फलकधारकांना सूचना केल्या आहेत. वादळ, वारा किंवा जोरदार पावसाने स्ट्रॅक्चर पडून जीवित किंवा वित्त हानी झाल्यास त्यास जाहिरात फलक धारकास जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये विविध ठिकाणी जाहिरात फलक धारकांनी जाहिरात फलक मंजूर करुन उभारले आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि उन्हाळ्यात अवकाळी पावसाच्या वेळी वादळ, वारा मोठया प्रमाणावर येत असतो. अशा प्रकारच्या वादळवार्याने कुजलेली, गंजलेली, कमकुवत,
अशा प्रकारचे जाहिरात फलकांचे स्ट्रक्चर पडुन जीवितहानी किंवा वित्तहानी होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. या घटना टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे मंगळवारी (दि.16) बैठक पार पडली.
या बैठकीस सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उपायुक्त संदीप खोत तसेच संबंधित विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील काही जाहिरात फलक हे महापालिका परवानगीकरीता प्रलंबित आहेत. ही बाब उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. तसेच सर्व जाहिरात फलकांची सादर केलेली स्ट्रक्चर स्टॅबिलिटी पुन्हा सन 2024-25 एप्रिलअखेरपर्यंत तपासून घेण्याबाबत सूचना बैठकीत देण्यात आल्या.
अनेकदा मंजूर केलेल्या फलकांचे नुतनीकरण करताना स्ट्रक्चर स्टॅबिलिटी सादर केलेले असले तरीही अपघात घडल्याचे निदर्शनास आले आहे. अनेकदा जीवित आणि वित्त हानी होण्याची शक्यता असते.
प्रमाणपत्र देणारा अभियंता जबाबदार असणार
स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र आकाशचिन्ह व परवाना विभागास सादर करणे बंधनकारक असणार आहे. जाहिरात फलकांना ज्या संरचना अभियंत्याने प्रमाणपत्र दिलेले आहे, त्यापैकी एखादे जाहिरात फलक कमकुवत आढळले किंवा फलक पडून काही जिवित अथवा वित्तहानी झाल्यास संबंधित संरचना अभियंतास जबाबदार धरण्यात येणार आहे.
याबाबत आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत, अशी माहिती आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी दिली.