कान्हे, (वार्ताहर) – एकीकडे कडक उन्हामुळे मावळ तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहे. त्यातच आता सायंकाळच्यावेळी ढगाळ वातावरण असते. जिल्ह्यासह राज्यात ठिकठिकाणी गारपीट आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे एकाच दिवसात नागरिकांना वेगवेगळे ऋतू पाहण्यास मिळत आहेत. बदलत्या वातावरणामुळे मावळवासियांची ‘डोकेदुखी’ वाढली आहे. ताप, थंडी, डोकेदुखी, सर्दी, खोकला असे विविध आजारांचे निरीक्षण तालुक्यातील वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
मावळ तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून कडक उन्हाळा आहे. उन्हाचा पारा ४० अंशाच्याही पुढे गेल्याने दुपारच्यावेळी रस्ते ओस पडत आहेत. उष्माघात टाळण्यासाठी शेतामध्ये काम करणारेही दुपारच्यावेळी झाडाचा आसरा घेत आहेत. ज्या नागरिकांना घराबाहेर पडणे अनिवार्य आहे ते देखील टोपी, गॉगल घेऊन बाहेर पडत आहेत.
मात्र बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारांनी ग्रासले आहे. वातावरणातील बदलाने अनेक आजारांना आमंत्रण मिळत असते, त्यामुळे स्वतःची काळजी घेणे हिताचे ठरते.
अशी घ्यावी काळजी
सार्वजनिक ठिकाणी उघड्यावरील अन्न पदार्थांचे सेवन करणे टाळावे. उकळून गार केलेले पाणी प्यावे. फ्रीजमधील अतिथंड पाणी पिणे शरीराला घातक ठरू शकते. गरम केलेले पाणी कोमट झाल्यावर ते पाणी पिण्यास वापरावे. ताजे आणि गरम अन्न पदार्थ खावेत. पावसात केस ओले झाले तर लगेच सुकवावे. बाहेर निघताना रेनकोट, छत्री याचा अवलंब करावा. सर्दी, खोकला, ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन व औषधोपचार घ्यावे. घरगुती उपचार करणे टाळावे. तसेच आजार असल्यास गर्दीत जाणे टाळावे
एसीतून लगेच उन्हात जाऊ नये
काहीजणांच्या घरी, गाडीत आणि कार्यालयात एसी असतो. मात्र काही कामानिमित्त त्यांना उन्हात जावे लागते. मात्र नागरिकांनी एसीमधून थेट उन्हात जाऊ नये. एसीमधून बाहेर पडल्यावर बाहेरच्या वातावरणाशी एकरूप होण्यासाठी काही काळ थांबावे आणि मगच उन्हात जावे, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.
या आजारांमध्ये होतेय वाढ
अंशतः ढगाळ वातावरणामुळे कोरडा खोकला, सर्दी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, उलट्या अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. घरातील एकाला सर्दी-खोकला झाल्यास त्याच्यामुळे इतरांनाही संसर्ग होण्याचा धोका आहे. श्वसन संसर्गाच्या रुग्णांतही वाढ झाल्याचे चित्र मावळ तालुक्यात आहे.