पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पाणीटंचाईचा परिणाम मार्केट यार्डातील आवकेवर होत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक घटल्याने कोथिंबीर आणि मुळेंच्या भावात घाऊक बाजारात जुडीमागे प्रत्येकी ५ रुपयांनी वाढ झाली आहे. तर, मेथी आणि कांदापतच्या भावातही जुडीमागे २ रुपयांनी वाढ झाली आहे. उर्वरित पालेभाज्यांचे वाढलेले जुडीचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
शनिवारची (दि. २३) साप्ताहिक सुट्टी आणि सोमवारी (दि.२५) धुलिवंदनामुळे मार्केट बंद होते. या पार्श्वभूमीवर रविवारी पालेभाज्यांची मोठी आवक होण्याचा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात आवक घटली. मागील आठवड्यात २ लाख जुडी आवक झालेल्या कोथिंबिरीची दीड लाख जुडीच आवक झाली. तर मागील आठवड्यात १ लाख जुडी आवक झालेल्या मेथीची ७० हजार जुडीच आवक झाली. आवकच्या तुलनेत मागणी आहे.
मात्र, धुलिवंदनाला मांसाहाराचा बेत असतो. त्यामुळे तुलनेने मागणी कमी होती. तरीही पालेभाज्यांच्या भावात वाढ झाली आहे. येत्या कालावधीत भावात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. घाऊक बाजारात कोथिंबिरीला जुडी- ८ ते १५ रुपये, मेथ-८ ते १२ रुपये, कांदापात-६ ते १२ रुपये आणि मुळेला ८ ते १५ रुपये भाव मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.