मुंबई: कोलकात्यात भडकलेल्या हिंसेचे बिंग भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी तृणमूल काँग्रेसवर फोडले. ते म्हणाले, हिंसेबद्दल ममता बॅनर्जी आम्हाला दोषी सांगत आहेत. मात्र आम्ही संपूर्ण देशात निवडणूक लढवत असून तृणमूल केवळ पश्चिम बंगालमधील 42 जागांवर निवडणूक लढवत आहे. देशभरात आतापर्यंत लोकसभा निवडणुकांचे सहा टप्पे पार पडले. कुठेही हिंसा झाली नाही मग पश्चिम बंगलमध्येच हिंसा कशी काय झाली? याचाच अर्थ असा की तृणमूल या हिंसेसाठी कारणीभूत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी कोलकाता प्रकरणावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले दंगली घडवून निवडणुका जिंकणे हा अमित शहा यांचा इतिहास आहे. उत्तर प्रदेशमध्ये ज्याप्रकारे दंगली घडवून सत्ता हस्तगत केली तसेच बंगालमध्ये करता येईल, असे भाजपला वाटले होते. त्यामुळेच मंगळवारचा प्रकार घडवला गेला. मात्र जे उत्तर प्रदेशात घडले ते बंगालमध्ये घडणार नाही. भाजपाचा पराभव अटळ आहे अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी कोलकाता येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी दिली आहे. पराभव दिसत आहे म्हणून भाजपनेच जाळपोळ केली आणि आता रडत आहेत असेही मलिक म्हणाले.