तिरुपती – तो मी नव्हेच म्हणणारे लखोबा लोखंडे अनेकवेळा पोलिसांच्या जाळ्यात सापडतात पण आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे तीन युवकांशी लग्न करून त्यांना फसवून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू आणि रोकड लंपास करणारी 30 वर्षीय युवती पोलिसांच्या जाळ्यात सापडली आहे.
एम. सुहासिनी नावच्या युवतीबाबत तिच्या तीन पतींनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर अलिपिरी पोलिसांनी तिला अटक केली आहे. लग्न करून फसवणूक केल्याची आणि मौल्यवान वस्तू व रोकड लंपास केल्याची तिच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. सुनील नावाच्या व्यक्तीने तिच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
गेल्या डिसेंबरमध्ये तिने सुनील यांच्याशी लग्न केले तेव्हा सुनीलच्या पालकांनी तिला 20 ग्रॅमचे सोन्याचे दागिने दिले होते. काही दिवसांनी लग्नाआधीचे कर्ज फेड्यासाठी तिने सुनील यांच्याकडून चार लाख रूपये आणि त्यांच्या वडिलांकडून दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर तिच्या वागण्यात बदल झाल्याने सुनील यांनी तिच्याकडे पैशांबाबत विचारणा केली असता घरातील मौल्यवान वस्तू आणि रोकड घेऊन ती बेपत्ता झाली.
नंतर तिचे आधारकार्ड तपासले असता तिने नेल्लोर जिल्ह्यातील व्यक्तीशी आधीच लग्न केल्याचे आणि तिला दोन अपत्ये असल्याचे निष्पन्न झाले. खोलात जाऊन तपास केला असता तिने विनय नावाच्या आणखी एका व्यक्तीशी लग्न केल्याचे दिसून आले. पहिल्या पतीच्या मदतीने तिने हे गुन्हे केल्याचे पोलिस तपासात आढळून आले आहे.