-राज्य सरकारसमोर मोठा प्रश्न
-लसीसाठी उणे 20 तापमानाची गरज
पुणे – स्पुटनिकलस टोचण्यासाठी जे केंद्र हवे ते वातानुकुलित (एसी) यंत्रणा असलेले हवे अशी अट “भारत बायोटेक’ ठेवली आहे. त्यामुळे या केंद्रांची व्यवस्था करायची कशी, हा मोठा प्रश्न राज्य सरकार समोर उभा ठाकला आहे.
स्पुटनिक लसीचे उत्पादन “भारत बायोटेक’ करणार आहे. सप्टेंबरपासून ही लस बाजारात उपलब्ध होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, ही लस देण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर हवे आहे ते वातानुकुलित यंत्रणा असलेले हवे आहे.
कारण या लसीसाठी उणे 20 एवढे तापमान लागणार आहे. कोविशील्ड किंवा कोवॅक्सीन लसीसाठी उणे दोनपर्यंत तापमान पुरेसे आहे. परंतु, स्पुटनिकसाठी ते जास्त लागणार आहे. लसीची निर्मिती ते मुख्य वाटप केंद्र ते लसीकरण केंद्रांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे.
दळणवळणाची जबाबदारी “भारत बायोटेक’ घेणार असले तरी लसीकरण करताना ती जागा वातानुकुलित असण्याची आवश्यकता आहे. त्याची तयारी कशी करायची हा प्रश्न आरोग्य खात्याला पडला आहे.
स्पुटनिक लस टोचण्यासाठी वातानुकुलित केंद्र असले पाहिजे असे “भारत बायोटेक’चे म्हणणे आहे. सध्या त्यांच्याशी एकच बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली आहे. त्याचे सर्व चित्र अद्याप क्लिकर झाले नाही. त्यामुळे आताच त्याच्या तयारीविषयी पूर्णपणे माहिती देऊ शकत नाही.
– डॉ. अर्चना पाटील, संचालक, आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य