हिंजवडी – पंचवीस वर्षांपासून आम्ही हिंजवडीत येऊन वास्तव्य करत आहे. परंतु अद्याप पिण्याचे मुबलक पाणी मिळत नाही. किमान आतातरी आम्हाला पिण्याचे शुद्ध व मुबलक पाणी द्यावे, अशी आर्त हाक हिंजवडीतील रहिवाशांनी विशेष ग्रामसभेत मांडली.
महाराष्ट्र दिनी होणारी ग्रामसभा कोरम अभावी तहकूब झाल्याने सरपंच शिवनाथ जांभुळकर यांच्या अध्यक्षतेखाली हिंजवडी ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी सभागृहात विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. या सभेत अनेक नागरी समस्या व मूलभूत प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या वेळी पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी, अंतर्गत रस्ते, वाहतूक कोंडी, विजेच्या समस्या व ग्रामपंचायतीकडून बिल्डरांना देण्यात ना हरकत दाखल्यावर तसेच पीएमआरडीएच्या प्रस्तावित पर्यायी रस्त्याबाबत व प्राधिकरणाच्या गलथान कारभारावर वादळी चर्चा झाली.
येथील साखरे, हुलावळे वस्तीवर राहणाऱ्या चितोडीया या ग्रामस्थाने वस्त्यांमध्ये पाणी येत नसल्याच्या तक्रारीचा पाढा वाचत सर्व वॉर्डात समान पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. येथे अनेकजणांनी गुंठा दोन गुंठे जागा घेऊन घरे बांधली आहेत व मागील अनेक वर्षांपासून ते येथील रहिवासी बनले आहेत. मात्र कर भरून ही त्यांचा पाणी प्रश्न मार्गी लागत नसल्याची तक्रार या वेळी करण्यात आली.
दरम्यान गावठाण व अन्य परिसरात अंतर्गत व मुख्य रस्त्यांवर अनेक स्थानिक व भाडेकरू ग्रामस्थ वाहने अनधिकृत पार्क करून अनेकदा वाहतुकीचा खोळंबा करतात. त्यामुळे स्थानिकांना अंतर्गत रस्त्यावर वाहने चालवणे जिकिरीचे होत आहे. यासाठी ग्रामपंचायत आणि पोलिसांच्या वाहतूक विभागाने संयुक्तरित्या कारवाई करून ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक वसंत साखरे यांनी केली.
मागील सहा महिन्यांपासून हिंजवडी येथे कचरा व्यवस्थापन करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या असून, निविदा खुल्या न झाल्याने कचरा व्यवस्थापन करण्यासाठी एका कंत्राटदारची तात्पुरती (हंगामी) नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे या कंत्राटदारांचा मलिदा खातोय कोण असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. सहा सहा महिने कचऱ्याला कंत्राटदार मिळत नाही ही बाब गंभीर असून, या संबंधी दाद कुणाकडे मागायची असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
हिंजवडी येथील जयरामनगर येथे नव्याने सुरू असलेल्या रस्त्याचे काम थांबले आहे. येथील ड्रेनेज लाईन देखील बंद आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचे वसंत साखरे म्हणाले.
प्रशासनातील अनेक कामे प्रलंबित आहेत. गावतील मूलभूत प्रश्न सुटत नसल्याने महापालिका किंवा नगरपालिका ही वारंवार होणारी मागणी रास्त असल्याचा मुद्दा यानिमित्ताने ऐरणीवर आला. ग्रामस्थांच्या मूलभूत प्रश्नांकडे प्रशासन आणि पदाधिकारी वारंवार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला.
ग्रामपंचायत सदस्यांनी लावली फक्त हजेरी
सोमवारी (दि. 9) तहकूब ग्रामसभा होणार याबाबत दवंडी व जनजागृती करून ही अनेकांनी या ग्रामसभेकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते. विशेष म्हणजे गावगाडा चालविणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांनी फक्त सभेला हजेरी लावण्याचे काम केले. अनेक सदस्य सही करून निघून गेल्याने जनतेने मोठ्या अपेक्षेने निवडून दिलेल्या सदस्यांना गावाच्या विकासाचे काही घेणे देणे आहे की नाही असा सूर देखील या सभेत उमटला होता.
तरुण विधवांना समाजात प्रतिष्ठा देण्याचा प्रस्ताव
या वेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आपला व्हॉट्सऍप नंबर जनतेसाठी खुला केल्याने आयुक्ताच्या या जनहितार्थ भावनेचा आदर करत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. या सभेत ऐन तारुण्यात विधवा झालेल्या महिलांना समाजात चांगली वागणूक व प्रतिष्ठा मिळावी. त्यांना समारंभात मान सन्मान देण्यात यावा, असा एक चांगला समाजाभिमुख प्रस्ताव वसंत साखरे यांच्याकडून मांडण्यात आला. त्यास जमलेल्या महिलांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद देत स्वागत केले. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.