हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील शेवाळा येथील दोन चुलत भाऊ कयाधू नदीत बुडाल्याची दुर्देवी घटना घडली. स्वराज दीपक सूर्यवंशी आणि शिवराज संदीप सूर्यवंशी (वय साडेतीन वर्ष) अशी नदीत बुडून मृत्यू पावलेल्या दोघांची नावे आहेत.
आखाडा बाळापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वराज आणि शिवराज शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास खेळताना अचानक बेपत्ता झाले. कुटुंबिय, नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र ते सापडले नाही. अखेर रात्री 8 वाजताच्या सुमारास कयाधू नदी पात्रात दोघांचे मृतदेह सापडले.
अखेरच्या क्षणीही हातात हात –
स्वराज आणि शिवराज दोघे चुलत भाऊ होते. दोघांची घट्ट मैत्री होती. ते दररोज एकत्रच खेळायचे. शुक्रवारी दोघेही एकाच वेळी खेळताना गायब झाले. कयाधू नदीपात्रातून त्यांचा मृतदेह बाहेर काढला त्यावेळी दोघांचे हात एकमेकांच्या हातात घट्ट पकडलेले होते. अखेरच्या क्षणीही भावाचा हात सोडला नाही. हे दृश्य पाहून उपस्थित गहिवरून गेले होते. सूर्यवंशी कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.