मुबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याचे अल्टिमेटम दिल्यानंतर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात हनुमान चालिसा पठण करण्याच्या घोषणेवरून राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.
“मी स्वतः हिंदू आहे, मी स्वतः दररोज हनुमान चालिसा वाचतो, पण मी त्याचा बाऊ करत नाही,” अअसे म्हणत नाना पटोले यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तसेच राज्य सरकारने धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना, मग ते कोणीही असो सभा घ्यायला बंधनं घातली पाहिजेत, अशी मागणीही केली आहे.
एका वृत्तवाहिनी सोबत बोलताना नाना पटोले म्हणाले, “खरंतर हिंदू-मुस्लीम हा वाद महागाईवरून लोकांचं लक्ष बाजूला सारण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. आमची राज्य सरकारला विनंती आहे की अशा पद्धतीने धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना, मग ते कोणीही असो त्यांना सभा घ्यायला बंधनं घातली पाहिजेत. त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. महाराष्ट्रात एकात्मता आणि भाईचारा संपवण्याचा जो कोणी प्रयत्न करत असेल त्याला शासन केलं पाहिजे, ही मागणी आम्ही काँग्रेसच्या वतीने करतो आहे.”
“कोणालाही आपआपल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करण्याला विरोध करण्याचं काही कारण नाही, पण त्याचा जो बाऊ केला जातोय तो अडचणीचा मुद्दा आहे. मी स्वतः हिंदू आहे, मी स्वतः दररोज हनुमान चालिसा वाचतो, पण मी त्याचा बाऊ करत नाही. धार्मिक तेढ निर्माण केला जातोय आणि महागाई बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यात केंद्रातील सरकारचं अपयश समोर येतंय,” असे नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.