Himanta Biswa Sarma : भाजपाचे नेते आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भगवद्गीतेमधील एका श्लोकाचा त्यांनी आसामी भाषेत अनुवाद केला होता. याबाबतची एक पोस्ट त्यांनी ट्विटरवर शेअर केली होती. या पोस्टमध्ये बिस्वा यांनी, “शूद्रांनी ब्राह्मण, क्षत्रीय आणि वैश्य यांची सेवा करणे, हे त्यांचे नैसर्गिक कर्तव्य आहे.” असे म्हटले होते. त्यांच्या या पोस्टवरून देशभरात एकच गोंधळ निर्माण झाला होता. त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका करण्यात आली होती. दरम्यान या टीकेनंतर त्यांनी आपली ती पोस्ट डिलीट केली.
हिमंता बिस्वा सरमा यांनी केलेल्या पोस्टवर विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपाची मनुवादी विचारधारा वर्णव्यवस्थेला खतपाणी घालणारी आहे, अशी टीका केल्यानंतर सदर पोस्ट सरमा यांनी डिलीट केली. तसेच नवीन पोस्ट टाकत त्यांनी माफी मागितली आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘नियमितपणे, दररोज सकाळी मी माझ्या सोशल मीडिया हँडलवर भगवद्गीतेतील एक श्लोक शेअर करतो. आत्तापर्यंत मी ६६८ श्लोक पोस्ट केले आहेत. अलीकडेच माझ्या टीममधील एका सदस्याने चुकीच्या भाषांतरासह अध्याय 18 श्लोक 44 मधील एक श्लोक पोस्ट केला आहे. हिमंता बिस्वा सरमा पुढे म्हणाले, ‘चूक लक्षात येताच मी लगेच पोस्ट डिलीट केली. हटवलेल्या पोस्टमुळे कोणी दुखावले गेले असेल तर मी मनापासून माफी मागतो. महान पुरुष श्रीमंत शंकरदेव यांच्या नेतृत्वाखालील सुधारणा चळवळीमुळे आसाममध्ये जातिविरहित समाजाचे एक आदर्श चित्र आहे.
वादग्रस्त पोस्टमध्ये काय लिहिले होते?
शूद्रांनी ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या इतर तीन जातींची सेवा करणे हे शूद्राचे कर्तव्य आहे असे सांगण्यासाठी गीतेतील श्लोकाचा चुकीचा अनुवाद करण्यात आला. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे नेते आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सरमा यांच्यावर जोरदार टीका केली आणि ते म्हणाले की प्रत्येक नागरिकाला समान वागणूक देण्याची शपथ आपण पूर्ण करत नाही.