शिमला – हिमाचल प्रदेशच्या पर्यटन उद्योगावर यंदा मुसळधार पावसामुळे मोठा परिणाम झाला आहे. धर्मशाळा ते मॅक्लॉडगंज हा राष्ट्रीय महामार्ग अनेक ठिकाणी खराब झाला आहे. केवळ धर्मशाळेत पावसामुळे 6 कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. यात आणखी वाढ होऊ शकते. कारण अनेक विभागांकडून अहवाल येणे बाकी आहे.
धर्मशाला येथील हॉटेल व्यावसायिक प्रेम सागर म्हणाले, सध्या पावसाळा चालू आहे आणि तो सुमारे 20 दिवस चालेल. आपण आता पावसाळ्याच्या मध्यावर आहोत. यंदा मान्सून योग्य वेळी सुरू झाला. पण हिमाचलमध्ये मागील सहा वर्षांपेक्षा जास्त पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी अनियोजित बांधकामांमुळे पाणी साचत असल्याने सर्वांना त्रास होत आहे. धर्मशाळा ते मॅक्लॉईडगंज हा राष्ट्रीय महामार्ग पावसाळ्याच्या अवघ्या 30 दिवसांत अनेक ठिकाणी खराब झाला आहे.
कोविडमुळे गेल्या तीन वर्षांपासून प्रवासी उद्योग आधीच वाईट टप्प्यातून जात आहे. खराब कनेक्टिव्हिटीमुळे आता पुढील दोन वर्षे त्याचा फटका बसू शकतो. प्रचंड भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे पर्यटन उद्योगावर वाईट परिणाम झाला आहे. यामध्ये 90 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.
धर्मशाला हे ठिकाण पावसासाठी देखील ओळखले जाते. परंतु यावर्षी पावसामुळे येथील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. धर्मशाळेतील नुकसान 6 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. धर्मशाला ते मॅक्लॉईडगंजपर्यंतचा रस्ता अनेक ठिकाणी खराब झाला आहे आणि राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी सावधगिरीचे फलक लावले आहेत. दुसरा धर्मशाळा-मॅक्लॉईडगंज मार्ग, खडा दांडा रस्ता देखील खराब झाला आहे. त्यामुळे वाहतूक वळवण्यात आली आहे. या सगळ्यात प्रवासी उद्योगावरही वाईट परिणाम झाला आहे आणि फार कमी पर्यटक येत आहेत.
दरम्यान, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, मान्सूनने हिमाचल प्रदेशात 20 जूनला धडक दिल्यापासून 187 जणांचा बळी गेला आहे. हिमाचल प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानुसार, आतापर्यंत 34 लोक बेपत्ता आहेत आणि 215 लोक जखमी झाले आहेत. राज्यात 702 घरांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत 5620.22 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.
पाऊस आणि पुरामुळे 241 दुकानांचे तर 2218 गोशाळांचे नुकसान झाले आहे. या सगळ्यात आतापर्यंत 5620.22 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. भूस्खलनाच्या 72 घटनांव्यतिरिक्त, राज्यात अचानक पुराच्या 52 घटना घडल्या आहेत. तीन राष्ट्रीय महामार्गांसह 650 हून अधिक रस्ते बंद आहेत.