हिमाचल प्रदेश – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हिमाचल प्रदेशमध्ये विकासाची कामे वेगाने सुरू आहेत. गेल्या पाच वर्षांत डबल इंजिनच्या सरकारने अनेक विकास प्रकल्प पूर्ण करून राज्याचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.
त्यामुळे या वेळीही जनतेचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतील आणि हिमाचल प्रदेशमध्ये विकासाचे व सुशासनाचे कमळ पुन्हा उमलेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्यक्त केला. भाजपला साथ देण्याचे आवाहन उपस्थित जनतेला केले.
हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी आज राज्यातील झंडुता विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार जीत राम कटवाल व कांगडा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार पवन काजल यांच्या समर्थनार्थ आयोजित जाहीर सभांना संबोधित केले.
नितिन गडकरी म्हणाले, गेल्या पाच वर्षांत राज्यात पूर्ण झालेल्या अनेक रस्ते प्रकल्पांसह अनेक नवीन रस्ते प्रकल्पांच्या तरतुदीमुळे राज्याची कनेक्टिव्हिटी वाढेल आणि पर्यटन क्षेत्राचा विकास होईल. यामध्ये “पर्वतमाला’ प्रकल्पांतर्गत रोप-वे, केबल कारचा समावेश आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 2,747 कोटी रुपये किंमतीचे व 36 किमी लांबीचे पाच रोपन्वे प्रकल्प तयार केले जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्यातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि उत्तम कनेक्टिव्हिटी देण्यासाठी अनेक बोगदे (टनल) प्रकल्पांचीही तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत हिमाचल प्रदेशमध्ये 9 हजार कोटी रुपये किंमतीचे व 41 किलोमीटर लांबीचे 36 बोगदे (टनल) बांधले जातील.
कॉंग्रेसच्या कार्यकाळात हिमाचल प्रदेशात चुकीच्या पद्धतीने पायाभूत सुविधा निर्माण केल्या गेल्या, त्याचे परिणाम आजही राज्यातील जनतेला भोगावे लागत आहेत. पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात कॉंग्रेसच्या उदासीनतेचा फटका हिमाचल प्रदेशसारख्या राज्यांना बसला आहे. 2014मध्ये केंद्रात मोदी सरकार आल्यापासून हिमाचल प्रदेशमध्ये होत असलेल्या विकासकामांचा पुनरुच्चार करत गडकरी यांनी औद्योगिक विकास योजना, रेल्वे बजेट वाढवण्याबरोबरच राज्याच्या सांस्कृतिक विकासावरही सरकारच्या वतीने काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.