नवी दिल्ली : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात येत आहे. आज सोलन येथील सभेला संबोधित करताना हिमाचल प्रदेशातील जनतेशी वैयक्तीक आणि भावनिक नाते असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. भाजपाला पुन्हा सत्तेत आणण्याचे आवाहन पंतप्रधानांकडून राज्यातील जनतेला करण्यात येत आहे. “कमळाच्या फुलाला (भाजपाचं निवडणूक चिन्ह) दिलेलं प्रत्येक मत थेट मोदीच्या खात्यात आशीर्वाद म्हणून जाईल”, असे म्हणत भाजपला विजयी करण्याचे आवाहन यावेळी मोदींनी केले आहे.
सभेला संबोधित करताना, “भारतीय जनता पक्षाचा उमेदवार कोण आहे हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुम्ही केवळ कमळाचं फुल लक्षात ठेवा. मी हे फुल घेऊन तुमच्याकडे आलो आहे. मतदान करताना कमळाचं फुल दिसल्यास भाजपा आहे हे समजून घ्या”, असं मोदींनी म्हटलं आहे. “दिल्लीत मोदी आहे, आता या राज्यातही मोदीला मजबूत करायचं आहे का नाही?” असा सवालही पंतप्रधानांनी जनतेला यावेळी विचारला.
सोलनमधील सभेत पंतप्रधानांनी काँग्रेसचा देखील समाचार घेतला. “हिमाचल प्रदेशमधील आधीच्या काँग्रेस सरकारने स्वार्थापायी राज्यात स्थैर्य नांदू दिले नाही. याच कारणासाठी लहान राज्यांमध्ये स्थिर सरकार काँग्रेसला नको आहे”, असा हल्लाबोल मोदींनी केला आहे. “काँग्रेस म्हणजे अस्थिरता, काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, काँग्रेस म्हणजे स्वार्थ आणि काँग्रेस म्हणजे घराणेशाही” असे टीकास्र त्यांनी यावेळी डागलं. तीन दशकांच्या अस्थिरतेमुळे देशाची विकासात पीछेहाट झाल्याचा आरोपही मोदींनी केला आहे.
“तरुणांना आणि शेतकऱ्यांना आश्वासनानुसार कर्जमाफी न देता त्यांचा विश्वासघात करण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे. मात्र, भाजपाने सत्तेत येताच शेतकऱ्यांना भरघोस मदत केली असून त्यांचे जीवनमान उंचावले आहे”, असे मोदी यांनी म्हटले आहे.